“जो व्यक्ती कुटुंब सांभाळू शकत नाही तो महाराष्ट्र व करोनाबाधित रूग्ण कस सांभाळणार?”

0
224

मुंबई, दि.०९ (पीसीबी) : राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपा नेते नारायण राणे यांनी आज पत्रकारपरिषदेत बोलताना ताशेरे ओढलेत. याचबरोबर राज्यात लसींच्या तुटवड्यावरून केंद्र व राज्य सरकारमध्ये सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप, अनिल देशमुख, सचिन वाझे प्रकरणावरून देखील ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

“महाराष्ट्रात करोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. करोना संसर्ग वाढत असताना, त्यावर उपाययोजना करायला हा महाराष्ट्र कमी पडला आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत रूग्णांची संख्या वाढत आहे, मृत्यूंची संख्या वाढत आहे. याचं गांभीर्य राज्य सरकारला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे हे केंद्राकडे बोट दाखवत आहेत. राज्यात डॉक्टर्स नाही, बेड्स नाही, नर्स नाही ही कोणाची जबाबदारी आहे? जसं माझं कुटुंबं माझी जबाबदारी, तर महाराष्ट्र तुमचं कुटुंबं असेल, तर या सर्व गोष्टी उपलब्ध करणं. रूग्णांवर उपचार योग्यप्रकारे करणं, त्यांना बरं करणं ही तुमची तुमची जबाबदारी नाही का ? पिंजऱ्यात काय जाऊन बसत आहात, स्वतःला लॉकडाउन करून घेतलं आहे. मातोश्रीच्या बाहेर पडत नाही मग करोना होईल कसा? माझे कुटुंब माझी जबाबदारी असताना कुटुंबातील सगळी लोकं, रूग्णालयात कसे? म्हणजे कुटुंब सांभाळू शकत नाही तो व्यक्ती महाराष्ट्र व करोनाबाधित रूग्णांना कसं सांभाळणार? हे अपयश आहे. करोना हाताळायला हे सरकार कमी पडलं आहे. केंद्राकडे का बोट दाखवता?”, अशा शब्दात नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

राणे पुढे असंही म्हणाले कि, “माझा प्रश्न आहे सचिन वाझेला मुंबईतून १०० कोटी जमा करायला सांगितले, हे आदेश केवळ अनिल देशमुख यांचे नाहीत. यामध्ये सगळे राज्याचे प्रमुख सहभागी आहेत. मग तुम्ही जमा केलेले पैसे, लसीसाठी का नाही वापरत? ते कुठे जातात? कोणाकडे जातात? याबद्दल काहीतरी सांगा. मग बेड नाही व्हेंटिलेटर्स नाहीत असं सांगितलं जातं. वॉर्ड बॉय, नर्स, डॉक्टर्स यांची भरती कोणी करायची? केंद्राकडे बोट दाखवून आपलं अपयश झाकायचं काम हे राज्य सरकार करत आहे. जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस जनतेचं शोषण करण्याचा एककलमी कार्यक्रम या सरकारचा सुरू आहे. सर्व ठिकाणी भ्रष्टाचार सुरू आहे.” असे आरोप देखील यावेळी राणेंनी ठाकरे सरकारवर केला.