जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ?

0
624

मुंबई, दि. १५ (पीसीबी) –  लोकसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या  ८ दिवसांवर येऊन ठेपले आहेत. या निकालाआधीच राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता  आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी ६ महिन्यांचा कालावधी आहे. त्याआधी मंत्रिमंडळात काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.  तर लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान पक्षात प्रवेश केलेल्या काही ‘आयाराम’ नेत्यांना  मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाल्यास राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, विजयसिंह मोहिते पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो. या नेत्यांवर महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी दिली जाऊ शकते.

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल किंवा गृहखात्याची  मागणी  केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर रिक्त असलेले आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडे अतिरिक्त भार असलेले कृषी खाते विखेंना मिळण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी म्हटले आहे.