घरापासून दूर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता मिळणार  

0
636

मुंबई, दि. २० (पीसीबी) – घरापासून दूर शाळा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्याच्या शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. घरापासून दूर शाळा असल्यास  विद्यार्थ्यांना आता  वाहतूक भत्ता दिला जाणार आहे.  मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम,२००९ अंतर्गत वाहतूक भत्ता  देण्यात येणार आहे. यामुळे  दूर शाळेत पायपीट करत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्यातील ज्या गावांमध्ये वस्तीमध्ये किंवा वाड्यांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना घरापासून एक किमीपर्यंत शाळा नसल्यास आणि इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत तीन किमीपर्यंत शाळा नसल्यास वाहतूक भत्ता देण्यात येणार आहे.  यासाठी शाळांनी विद्यार्थ्यांच्या  राहत्या घरांची माहिती  प्राथमिक शिक्षण संचलनालाय पुणे  येथे  पाठवावी लागणार  आहे.

ज्या गावामध्ये शाळा नाही किंवा माध्यमिक शाळा नाही, तसेच विद्यार्थ्यांचे घर हे शाळेपासून अधिक अंतरावर आहे, ज्या शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे, ज्यांचा  जवळच्या शाळेमध्ये समावेश होणार नाही, अशा  विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता देणे गरजेचा आहे, असा निर्णय शिक्षण परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.

अशा गाव/ वस्ती/ वाडी यांची नावे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सात दिवसाच्या आत समग्र शिक्षा कार्यालयास सादर करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय प्रत्येक केंद्रामध्ये विखुरलेल्या व कमी पटसंख्या असलेल्या प्रत्येक केंद्रातील तीन शाळा तयार करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यांनी नियोजन करावे,  अशा सूचनाही दिल्या आहेत.