गोपीनाथ मुंडे आज भाजपचे यश पाहायला हवे होते – मुख्यमंत्री

0
511

बीड, दि. ३ (पीसीबी) – गोपिनाथराव मुंडेंच्या सानिध्यात कोणी आला तर त्या व्यक्तीमध्येही नेतृत्व गुण तयार होत होते इतकी ताकद त्यांच्यात होती. महाराष्ट्रातील सामान्य माणसाला नेतृत्व करायला त्यांनी शिकवले. गोपिनाथरावांमुळेच आमच्यासारखे नेते घडले, त्यामुळे आज भाजपाचे यश पहायला ते हवे होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते दिवंगत गोपिनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथ गड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले,  देशात युतीला मोठे यश मिळाले याचे श्रेय खऱ्या अर्थान मोदींना आहे. मोदींनी गरीब कल्याणाचा अजेंडा राबवल्यामुळे हे यश मिळाले. जनतेच्याही हे लक्षात आले, त्यामुळे त्यांनी मोदींच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. याचे श्रेय जसे मोदींना आहे, तसेच गोपीनाथराव मुंडेंनाही आहे. कारण, त्यांनीच आमच्या सारख्यांच नेतृत्व घडवले.

मुंडे साहेबांच स्वप्न होते, की मराठवाड्यातील आठही खासदार भाजपाचे असतील,  मात्र, आम्ही सातपर्यंत पोहोचलो आहोत. केवळ एकाच जागी केवळ चार हजार मतांनी पराभूत झालो. संभाजीनगरची जागा आम्हाला मिळाली असतील तर मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण झाले असते. मात्र, आता पुढच्या वेळी आठही जागा जिंकून त्या मुंडे साहेबांच्या चरणी अर्पण करु, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.