गद्दारांना 50 खोके… महाराष्ट्राला धोके, राष्ट्रवादीचे सरकारविरोधात आंदोलन

0
199

पिंपरी,दि.३१(पीसीबी) – गुजरातच्या निवडणुका मोदींनी जिंकण्यासाठी मदत म्हणून शिंदे फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील तरुणांच्या हक्काचा रोजगार गुजरातला पळविल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. महाराष्ट्राचे गद्दार..गुजरातचे वफादार..! गुजरात तुपाशी..महाराष्ट्र उपाशी..!, गद्दारांना 50 खोके..महाराष्ट्राला धोके.! द्या आमच्या रोजगाराची हमी..बंद करा गुजरातची गुलामी..! अशी जोरदार घोषणबाजी केली.

महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या घशात घालणाऱ्या शिंदे-फडवणीस सरकारच्या विरोधात आज (सोमवारी)बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वात महिला अध्यक्ष कविता आल्हाट यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध अंदोलन करण्यात आले. माजी अध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या उपस्थितीत खराळवाडी पोस्ट ऑफिस मध्ये सूमारे चार हजार पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले. या अंदोलनात माजी नगरसेवक अरुण बोराडे, प्रकाश सोमवंशी,राजू बनसोडे, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सचिव डॉ. अरुण शिंदे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष आयुष निंबारकर, मंगेश बजबळकर,अमोल रावलकर, दिनेश पटेल,राहुल पवार,श्याम जगताप,प्रवीण खरात,दीपक गुप्ता,सागर वाघमारे,साहिल शिंदे, रूबान शेख,रोहित मोरे,सुरज पटेल,पियुष अंकुश,बापू कातळे, युवराज पवार, संगीता कोकणे,मीरा कदम, समिताताई गोरे, दत्तात्रय जगताप, विशाल जाधव,अकबर मुल्ला,कुणाल जगताप,अनिल चव्हाण,इरफान शेख,विकास गाढवे,जितेश पुलवरे, तानाजी जवळकर,सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष समीर थोपटे,मयूर खरात,संकेत जगताप,केतन हुके सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना युवक शहराध्यक्ष इम्रान शेख म्हणाले, ”शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्रसाठी नाही तर गुजरात साठी काम करत आहे. या तीन महिन्यात सुमारे महाराष्ट्रातील युवक-युवतींना साडेतीन लाख रोजगार निर्मिती होणारे तीन मोठे प्रकल्प नेमके गुजरात मध्ये का पाठवले जात आहेत.? इतर राज्यात का गेले नाहीत?महाराष्ट्रात हजारो रोजगार उपलब्ध करून देणारा वेदांत फॉक्सकाँन,बल्क ड्रॅग पार्क व आता टाटा एअरबस हे तिन्ही प्रकल्प गुजरातच्या निवडणुका मोदी यांनी जिंकण्यासाठी मदत म्हणून महाराष्ट्रातील तरुणांच्या हक्काचा रोजगार तुम्ही गुजरातला स्थलांतरीत करीत आहात”.

”यामुळे महाराष्ट्रातील लाखो कुटुंबावर बेरोजगारीची वेळ तुम्ही आणली असून,महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगार करून निष्पाप तरुणांना भोंगे, दहीहंडी, हनुमान चालीसा,दिवे फटाके यामध्ये अडकवून सरकार सोयीचे राजकारण करत आहे. संपूर्ण देशाचे पोट भरणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील उद्योगधंदे हे शिंदे-फडणवीस सरकार ज्या गतीने गुजरातला पळवत आहे. त्यामुळे एक दिवस असा येईल की महाराष्ट्रातील तरुणांना युपी बिहारमध्ये नोकरी शोधायला जावं लागेल अशी परिस्थिती महाराष्ट्रातील युवकांवर आणली जात आहे. याचा आम्ही निषेध करतो.

महिला अध्यक्ष कविता अल्हाट म्हणाल्या “शिंदे फडणवीस सरकार हे गद्दारांच सरकार आहे,कोविड काळामध्ये असंख्य तरुणांचा रोजगार गेला असताना महाराष्ट्र मध्ये रोजगार निर्मिती करायचं सोडून हे सरकार महाराष्ट्रातील युवकांचा रोजगार गुजरातला पळवत आहे. याचा निषेध म्हणून पूर्ण महाराष्ट्रातील तरुणांनी रस्त्यावर उतरले पाहिजे.महाराष्ट्र सरकारचा तीव्र निषेध करते.

माजी नगरसेवक अरुण बोराडे म्हणाले, ”शरद पवार यांनी पुण्यात आयटी कंपन्यातून महाराष्ट्रातील लाखो लोकांना रोजगार देण्याचे काम केले. आणि हे 50 खोके सरकार आल्यापासून नागरिकांना फक्त धोके देण्याचं काम करत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रोजगार इतर राज्यात पळवला गेला असून इथल्या युवकांना भीक मागायची वेळ या शिंदे-फडणवीस सरकारने आणली आहे”.