जळगांव, दि. १८ (पीसीबी) – पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा निवडून आणण्याची जबाबदारी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या खाद्यांवर भाजपने दिली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या या भागात भाजपने जोरदार ताकद लावली होती. हा बालेकिल्ला ताब्यात घेणारच, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
आज (शनिवार) चंद्रकांत पाटील जळगाव जिल्ह्यात दुष्काळी दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जागा युतीच जिंकणार, १० पैकी १० जागा भाजप-शिवसेना युती पटकावेल, असा दावा पाटील यांनी केला. तसेच लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळेल, हे कोऱ्या कागदावर लिहून घ्या किंवा याबाबत पैज लावण्यास तयार आहे, असेही पाटील म्हणाले.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी – काँग्रेसची ताकद आहे. पुणे, बारामती, मावळ, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या महत्वाच्या जागावर भाजपने जोर दिला होता. यामुळे आघाडीच्या उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली. येथे भाजपला किती जागा मिळणार हे २३ मेरोजी निकालादिवशी स्पष्ट होणार आहे.