केंद्रीय मंत्र्यांने एका रात्रीसाठी विचारणा केली होती; सई परांजपे यांचा धक्कादायक गौप्यस्फोट

0
2546

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – बॉलीवूडमध्ये घोंगावत असलेले मीटूचे वादळ आता राजकारणाच्या दारापाशी येऊन धडकले आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मलाही ‘लैंगिक छळांच्या अनुभवांना सामोरे  जावे लागले आहे. काही ठिकाणी अनेकांनी माझे बळजबरीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला होता. तर एका केंद्रीय मंत्र्यांने  एका रात्रीसाठी माझ्याकडे  विचारणाही केली होती, असा धक्कादायक गौप्यस्फोट प्रसिध्द लेखिका, दिग्दर्शिका सई परांजपे यांनी केला आहे.

सई परांजपे  ‘सय’ या आत्मचरित्राच्या निमित्ताने  मुंबईत आल्या होत्या. यावेळी त्यांनी  ‘मीटू’ मोहीमेबद्दल भाष्य केले. लहानपणी सायकलवरून जात असताना एकाने  रस्त्यातच माझी छेड काढून पोलीस ठाण्यापर्यंत माझा पाठलागही केला होता.  छेड काढणाऱ्याविरुद्ध तक्रार करू नको, असाही  सल्ला मला तेव्हा दिला होता,  असे सई यांनी सांगितले.

सिनेसृष्टीत काम करताना अनेक पुरुषांनी बळजबरीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला होता. तर एका कार्यक्रमातून  बाहेर पडताना एका केंद्रीय मंत्र्याने घरी सोडण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्यासोबत जात असताना ‘माझ्यासोबत रात्र काढशील का’ अशी विचारणा त्यांनी केली होती. मात्र, मी त्यांना स्पष्ट  शब्दांत नकार दिला होता.  दरम्यान, या केंद्रीय मंत्र्यांचे नाव सांगायचे टाळून ते मंत्री आता हयात नसल्याचे  त्यांनी  सांगितले.