कुदळवाडीत दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारल्याने टोळक्यांकडून तरुणाला दगडाने मारहाण

0
853

भोसरी, दि. २१ (पीसीबी) – दुचाकील कट मारल्याचा जाब विचारला म्हणून चार जणांच्या टोळक्यांनी एका दुचाकीस्वार तरुणाला दगडाने जबर मारहाण करुन जखमी केले. ही घटना  बुधवारी (दि.१९) रात्री पावनेदहाच्या सुमारास स्पाईन रोड येथील कुदळवाडी ब्रिजखाली घडली.

मनिष कमलकांत पाठक (वय २९, रा साहिल फॉर्च्यून,एफ विंग, फ्लॅट नं. ११०७, जाधववाडी, चिखली) असे मारहाण होऊन गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार सुरज चंद्रकांत काशीद, आशिष माधव सुपेकर, वैभव ज्ञानोबा वारकरी आणि अनिकेत कदम (सर्व रा. घरकुल, चिखली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री पावनेदहाच्या सुमारास तक्रारदार मनिष हा त्याच्या दुचाकीवरुन स्पाईन रोड येथून चालला होता. यावेळी मागून भरधाव दुचाकीवरुन आलेला आरोपी सुरज याने मनिषच्या दुचाकीला कट मारला. यावर मनिषने त्याला दादा कट का मारला असे विचारले म्हणून सुरज याने मनिषला शिवीगाळ केली. तसेच पुढे कुदळवाडी ब्रिजखाली मनिष थांबला असता सुरज हा त्यांचे तीन मित्र आशिष, वैभव आणि अनिकेत यांना घेऊन तेथे पोहचला. तसेच यासर्वांनी मिळून मनिष याला पुन्हा लाथाबुक्क्या आणि दगडाने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. यादरम्यान  ईशात खान, समसुल्ला चौधरी, शफीक खान आणि आसिफ खान हे त्यांच्या कारने तेथे पोहचले. त्यांनी मनिष याला तुमची गाडीत इथेत लावा आम्ही तुम्हाला घरी सोडतो असे सांगून कारमध्ये बसवले. हे पाहताच आरोपी सुरज, आशिष, वैभव आणि अनिकेत यांनी पुन्हा मनिषला जबर मारहाण करुन कारची काच फोडली. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.