काश्मीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास भारत- पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध होईल- इम्रान खान

0
666

वॉशिंग्टन, दि. ३१ (पीसीबी) – आंतरराष्ट्रीय समुदायाने काश्मीरच्या प्रश्नाकडे लक्ष न दिल्यास आण्विक युद्ध होऊ शकते, अशी धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविण्याचा निर्णय मागे घेतला तरच भारताशी चर्चा शक्य आहे, असेही इम्रान यांनी म्हटले आहे. तर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी भारताशी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे इम्रान यांच्या मंत्रिमंडळातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

अमेरिकेतील एका वृत्त्वाहिनीमधील एका लेखामध्ये इम्रान खान यांनी हा इशारा दिला आहे. काश्मीरबाबत भारताने घेतलेला निर्णय रोखण्यासाठी जगाने काहीही न केल्यास दोन्ही अण्वस्त्र संपन्न देश युद्धाच्या दिशेने जातील, असे इम्रान यांनी म्हटले आहे. काश्मीरबाबत भारत आणि पाकिस्तान दरम्यान चर्चा व्हायला हवी, असे इम्रान यांनी म्हटले आहे. मात्र हे सांगताना काश्मीरमध्ये ३७० कलम लागू करण्यात यावे, काश्मीरमधून संचारबंदी उठवावी आणि काश्मीरमधून भारताने त्यांचे सैन्य मागे घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. काश्मीरवरील चर्चेत काश्मिरींसहित सर्व स्टेकहोल्डरचा समावेश करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

तर कुरैशी यांनी भारतासोबत द्विपक्षीय चर्चा करण्यात काहीच अडचणी नसल्याचे म्हटले आहे. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. मात्र भारत चर्चेला तयार आहे की नाही? यावरच सर्व काही अवलंबून असल्याचे कुरैशी यांनी म्हटले आहे. दरम्यान, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही भारत पाकिस्तानसोबत दहशत मुक्त आणि हिंसामुक्त वातावरणात द्विपक्षीय चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले होते.