श्रीरामपूर, दि. १४ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पैलवानांना चितपट केले, आता विधानसभा निवडणुकीत निवडून येण्याची शाश्वती नाही, त्यामुळे त्यांचे पैलवान अंगाला तेल लावून मैदानात उतरायला तयार नाहीत, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
महाजनादेश यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. काँग्रेस-राष्ट्रवादी १५ वर्षे सत्तेत असताना त्यांची मुजोरी आणि माजोरी वाढली होती.
काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वत:साठीच सत्ता राबवली. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात आपल्या सरकारने जनहिताचे निर्णय घेतले. पूर्वी विविध क्षेत्रात राज्य पिछाडीवर जात होते. पण आता पुन्हा प्रथम क्रमांकाकडे वाटचाल सुरू झाली आहे. समृद्ध महाराष्ट्र उभा करण्यासाठी विधानसभेवर सेना- भाजप युतीचा झेंडा फडकेल, असा दावा त्यांनी यावेळी केला.