कशासाठी लोकांना घाबरवताय? मनसे शिवजयंती साजरी करणारच

0
301
मुंबई, दि.१२ (पीसीबी) – औरंगाबाद महापालिकेच्या प्रचाराच्या निमित्तानं राज ठाकरे सध्या औरंगाबादेत आहेत. औरंगाबादेत मनसेकडून होणाऱ्या शिवजयंती उत्सवातही ते सहभागी होणार आहेत.
मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात शिवजयंती उत्सवाला पोलिसांकडून परवानग्या नाकारण्यात येत आहेत. त्यास राज ठाकरे यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. ‘काळजी घेणं हे प्रत्येकाचं काम आहे याबद्दल दुमत नाही. पण ‘करोना’च्या नावानं ज्या प्रकारे आव आणला जातोय, त्याला काही अर्थ नाही. आपल्याकडे इतर अनेक प्रकारची रोगराई आहे. माझ्या माहितीनुसार देशात दिवसाला ४०० लोक टीबीने मरतात. वर्षाकाठी हा आकडा दीड लाखांच्या आसपास आहे. इतकी रोगराई इथे आधीच असताना ‘करोना’वरून एवढा गोंधळ का माजवला जातोय? नाशिकला १४४ कलम लावलंय. कशासाठी लोकांना घाबरवताय? पोलिसांना याची नेमकी किती माहिती आहे,’ असा सवाल राज यांनी केला.
परदेशातून येणाऱ्या बातम्यांवरून इथे आपल्याकडे लोकांना घाबरवले जातंय. त्यांच्याकडं परिस्थिती वेगळी असते. त्यांच्याकडे छोटंसं सुरू आहे. आपल्याइतकी रोगराई तिथे नसते. त्यामुळे इतके घाबरण्यासारखे आणि घाबरवण्यासारखे आता तरी मला काही दिसत नाही. ‘करोना’चं नाव सांगून शिवजयंतीला परवानगी नाकारत असाल तर संभाजीनगरच्या निवडणुका अवघ्या २५-३० दिवसांवर आल्यात. त्या पुढे ढकलणार आहात का? कारण, हा एक-दोन दिवसांचा आजार नाही. अजून त्यावर औषध सापडले नाही. मग निवडणुकांवरही निर्णय घ्या,’ असे राज म्हणाले. मनसे शिवजयंती साजरी करणारच, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.