कंगनासारख्या नटवीनं शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणावे…???

0
224

इचलकरंजी, दि. २२ (पीसीबी) : शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या शेतकरी कायद्यांविरोधात रोखठोक भूमिका मांडली आहे. रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांची बाजू मांडताना केंद्र सरकारवर सडकून टीका केली. शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल्याचा आरोप करत कंगना रनौतवरही शेट्टी यांनी जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, “कंगनासारख्या नटवीनं शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणं यापेक्षा दुसरा विनोद नाही. शेतकऱ्यांवर टीका करणाऱ्या नट-नटींना शेतकऱ्यांची पोरं सडेतोड उत्तरं देतील.”

राजू शेट्टी म्हणाले, “पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश किंवा तेलंगणा असेल या ठिकाणी शेतकरी त्याच्या न्याय हक्कासाठी मोठ्या ताकदीने रस्त्यावर उतरला आहे. शेतकऱ्याला सरकारने मान्य केलेला हमीभाव मिळणं हा शेतकऱ्याचा घटनादत्त हक्क आहे. केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांच्या त्या हक्कावर गदा आली आहे. त्यांच्या आशा आकांक्षांचा चक्काचुर झाला आहे. अशा स्थितीत शेतकरी आपला आक्रोश घेऊन रस्त्यावर उतरत असताना कंगना रनौत सारख्या एका नटवीनं शेतकऱ्याला दहशतवादी म्हणणं याच्यासारखी दुसरी विनोदाची गोष्ट नाही.”