“आम्ही राज्यात सत्तेत नसलो तरी त्याचा ग्रामंपचायत निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही”: ‘या’ भाजप नेत्याच वक्तव्य

0
272

नागपूर, दि.२२(पीसीबी) – राज्यातील 19 जिल्ह्यात 1566 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची चाचपणी राज्य निवडणूक आयोगाने सुरु केलीय. ‘भाजप या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तयार आहे. पण, गावांमध्ये कोरोनाचे संकट वाढत असल्याने ग्रामपंचायत निवडणुका सहा महिने पुढे ढकलाव्या’ अशी मागणी भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे.

“कोरोनाचे संक्रमण ग्रामीण भागात वाढत आहे, त्यामुळे सरकारने आणि राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांचा विषय 6 महिने पुढे ढकलाव्या,” अशी विनंती करत आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना म्हटले आहे.

“महाविकास आघाडी सरकारवर लोक नाराज आहेत.सोयाबीन गेले, कापूस आणि धान शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. कोरोनामध्ये राज्य सरकारचे काही काम दिसून आले नाही. कोरोना हाताळण्यात सरकार अपयशी ठरलेय,” अशी टीका बावनकुळे यांनी केली.

आमचा पक्ष राज्यात सत्तेत नसला तरी त्याचा ग्रामंपचायत निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही. आमचा पक्ष कायम निवडणुकीसाठी तयार आहे. मात्र, राज्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलाव्या, असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
राज्य निवडणूक आयोगाने 19 जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यासंदर्भातील अहवाल 21 सप्टेंबरपर्यंत देण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. एप्रिल ते जून महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यावरून राज्यात वाद निर्माण झाला होता.