ऑडिट बिलांचेच नव्हे तर डॉक्टरांचेही करण्याची गरज – जयंत पाटील

0
225

सांगली,दि.२०(पीसीबी) – ऑडिट बिलांचेच नव्हे तर डॉक्टरांचेही करण्याची गरज आहे. याबाबत आमच्यासह डॉक्टरांनीही आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं मत सांगलीचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने सुरू केलेल्या कोव्हिड रुग्णालयाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.

‘करोना संसर्गाच्या भीतीने डॉक्टरांकडून रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार होत नाहीत. अनेक ठिकाणी रुग्ण आत आणि डॉक्टर बाहेर, अशी स्थिती आहे. यामुळे मृत्यूदरात वाढ होत आहे. ही स्थिती अशीच सुरू राहिल्यास रुग्णालयांच्या बिलांसह डॉक्टरांच्या कामाचे ऑडिट करावे लागेल,’ असे पाटील यांनी व्यक्त केले. ‘अनेक रुग्णालयांबद्दल तक्रारी वाढल्या आहेत. डॉक्टर बाहेर आणि पेशंट आत हे बरोबर नाही. डॉक्टर आतच जात नसतील तर उपचार कसे होणार? हा प्रकार गंभीर आहे. मी यावर कधी बोललो नाही, पण आता मृत्यू दर कमी येत नसल्याने यावर बोललेच पाहिजे. रुग्णांची काळजी डॉक्टरांनी घेतली तरच मृत्यू दर कमी होईल. ऑडिट बिलांचेच नव्हे तर डॉक्टरांचेही करण्याची गरज आहे. याबाबत आमच्यासह डॉक्टरांनीही आत्मचिंतन करण्याची गरज आहे.’ असंही पाटील यावेळी म्हणाले.

दरम्यान दक्षिण भारत जैन सभेने पुढाकार घेऊन सांगलीतील राम मंदिर परिसरात चोपडे हॉस्पिटलमध्ये डेडिकेटेड कोव्हिड उपचार केंद्र सुरू केले आहे. १०० खाटांच्या कोव्हिड केंद्राचे उद्घाटन रविवारी सकाळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झाले.