एमआयएम आणि तृणमूल काँग्रेस युती होणार का ?

0
173

कोलकाता,दि.१९(पीसीबी) : पश्चिम बंगालच्या राजकीय मैदानात आता मोठा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी कालपर्यंत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भिडण्याची भाषा करत होते, मात्र अचानक त्यांनी ममता दीदींसमोर युतीसाठी हात पुढे केला आहे. त्यामुळे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा निर्णय पश्चिम बंगालची सर्व राजकीय समीकरणं बदलू शकतो.

बिहारमध्ये पाच जागा जिंकून आत्मविश्वास दुणावलेल्या ओवेसींची नजर आता पश्चिम बंगालकडे वळली आहे. प्रत्येक राज्यातील विधानसभेत आमदार पाठवून ओवेसी आपला पक्ष मजबूत करताना दिसत आहेत. त्यातच, भाजपला पराभूत करण्यासाठी आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत युती करण्याचा प्रस्ताव ओवेसींनी दिला आहे. ‘नवभारत टाइम्स’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

निवडणूकपूर्व युती करुन एकत्र ताकदीने रिंगणात उतरण्याचा ओवेसींचा मानस आहे. मालदा, मुर्शिदाबाद आणि उत्तर दिनाजपूर यासारख्या अल्पसंख्याक मतदारसंघांवर ओवेसींची नजर आहे. त्यामुळे सत्ताधारी तृणमूलचे बळ वापरुन मुस्लिमबहुल भागावर एमआयएम लक्ष केंद्रित करु शकतं.

“ओवेसींचा ‘उपरे’ असा उल्लेख”-
विशेष म्हणजे ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वीच ओवेसींना ‘उपरे’ म्हणत अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. अशात हातमिळवणी करायची झाल्यास त्यांना तात्विक तडजोड करावी लागेल.
प. बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात मुख्य लढत मानली जाते. काँग्रेस आणि डाव्यांचे आव्हानही ममतांसमोर आहे. परंतु ओवेसी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले, तर त्याचा फटकाही ममता बॅनर्जींना बसू शकतो.

तृणमूलची मतं खाण्यासाठी भाजपने एमआयएमला बळ दिल्याचा आरोप तृणमूल खासदार सौगता रॉय यांनी केला होता. तर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी एमआयएम भाजपची ‘बी’ टीम असल्याचा आरोप करत ओवेसींवर मतांचे ध्रुवीकरण केल्याचा घणाघात केला होता.

“प. बंगालमध्ये राजकीय स्थिती काय?”-
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी 148 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 211 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली होती. तर काँग्रेसला 44 , डाव्या पक्षांना 26 आणि भाजपला अवघ्या तीन जागांवर विजय मिळाला होता.