महाराष्ट्र, दि.२४(पीसीबी) – उपद्व्यापी लोकांना संकटकाळात महाराष्ट्राच्या हिताचा योग्य मार्ग सुचो असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केलं आहे.
कोरोनाच्या संकटकाळात राज्य शासनाला आणि प्रशासनाला सहकार्य करायचं सोडून भाजप गलिच्छ उद्योग करत आहेत, अशी टीका करत या संकटाच्या काळात उपद्व्यापी लोकांना महाराष्ट्राच्या हिताचा योग्य मार्ग सुचो, असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडीमधील नेता चाल खेळतो आहे, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यावरच प्रतिक्रिया देताना अमोल मिटकरी यांनी भाजपचा जोरदार समाचार घेतला आहे.
दरम्यान वय वाढत गेलं अन् एखाद्याने गंभीर आजाराचा धसका घेतला तर बुद्धीला कसे उपद्व्याप सुचतात याचं हे ज्वलंत उदाहरण, अशी टीका त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे. राज्य एकीकडे जीवघेणा संघर्ष करत आहे. मरू की जिवंत राहु हे निश्चित सांगता येत नाही. जीवनमरणाचा संघर्ष रोज सुरु असतांना, प्रशासनाला मदत करायची सोडुन इतकं गलिच्छ राजकारण फक्त भाजपाच करू शकते याचा आज परत प्रत्यय आला, असं मिटकरी म्हणाले.