उध्दव केवळ बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आहे म्हणून, अन्यथा…

0
201

मुंबई, दि. ५ (पीसीबी) : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या राज्याला फडतूस गृहमंत्री लाभल्याची खळबळजनक टीका केली होती. त्यावरून भाजपाच्या अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत मातोश्रीच्या बाहेर पडू देणार नाही असा इशारा दिला होता. खरंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी ही इतकी जहरी टीका फडणवीस यांच्यावर केली होती. यावरूनच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या संबंधित पत्रकार परिषद घेत जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळेला नारायण राणे यांनी एकेरी भाषा वापरत उद्धव ठाकरे यांनी माझी सुपारी दिली होती असा आरोपही केला आहे.

उद्धव ठाकरे हा महाराष्ट्राला कलंक आहे. त्याची मुख्यमंत्री होण्याची लायकी नाही बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा याच्या पलीकडे कुठलीही ओळख नाही आणि तो देवेंद्र फडणवीस यांना फडतूस म्हणतोय असा एकेरी उल्लेख करत उद्धव ठाकरे यांच्यावर राणे यांनी जहरी टीका केली.

उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना अडीच तास सुद्धा मंत्रालयात गेले नाही असं त्यांचं काम आहे आणि ते काय पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या सुसंस्कृत आणि अभ्यासू अशा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. शिवराळ भाषेमध्ये उद्धव ठाकरे बोलत आहे असं म्हणत नारायण राणे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांना फडतुस म्हणत असशील तर तू महाफडतुस असल्याचा आरोप करत जी महिला ओळखीच्या दवाखान्यात अॅडमिट झाली, ती गर्भवती नसल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे त्याचे पत्र माझ्याकडे असल्याचं राणे म्हणाले आहे.

उद्धव ठाकरे यांनी डिलिव्हरीचं काम सुरू केलं का? ठाण्यात जाऊन उद्धव ठाकरे यांनी शिवराळ भाषेत टीका केली आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल असूया असल्याचे त्यातून दिसून आले आहे. बायकोला घेऊन जातो म्हणत टीकाही राणे यांनी केली. एखादा शिवसैनिक मोठा होत असेल तर तो उद्धव ठाकरेंना चालत नाही. लगेच उद्धव ठाकरे त्याला संपवायला निघतात असा आरोप करत राणे यांनी माझ्याशी अनेक गुंडांना सुपार्‍या दिल्या होत्या मात्र ते मला येऊन सांगत होते की दादा आम्ही असं करू शकत नाही असा दावा राणे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे स्वतः काहीही करू शकत नाही. शिवसैनिक रस्त्यावर उतरले तर गुंड राहणार नाही असं म्हणतात. मात्र तसे शिवसैनिक राहिलेले नाही. एकनाथ शिंदे असते किंवा नारायण राणे असते तर तसं घडलं असतं पण आता ते होऊ शकत नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांना नारायण राणे यांनी डिवचलं आहे. तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आहे, म्हणून बाहेर आहे. ईडीची भाषा करू नको नाहीतर काय परिणाम भोगावे लागतील याचा विचार कर असा थेट इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.