ईडीने शरद पवारांवर केलेल्या कारवाईचा राज्य सरकारशी संबंध नाही- देवेंद्र फडणवीस

0
459

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – ईडीने शरद पवार यांच्यावर केलेल्या कारवाईचा राज्य सरकारशी संबंध नाही. ईडीने केलेली कारवाई ही पूर्णपणे त्यांची कारवाई आहे. ईडी राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही. त्यामुळे शरद पवार यांच्यावर राज्य सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केली आहे असे म्हणणे चुकीचे आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य सरकारने हेतूपुरस्सर किंवा राजकीय हेतूने प्रेरित ही कारवाई केलेली नाही. असेही त्यांनी म्हटले आहे.

शिखर बँक घोटाळा प्रकरणी २३ सप्टेंबर रोजी शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह ७० जणांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी राज्य सरकारवर टीकेची झोड राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून उठते आहे. मात्र राज्य सरकारचा या कारवाईशी संबंध नाही असे आता मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ही कारवाई ईडीने केली आहे. या गुन्ह्यामध्ये ७० जणांची नावं आहे. १०० कोटी पेक्षा जास्त रकमेचा जेव्हा कोणताही गुन्हा असेल तेव्हा त्यासंदर्भातली दखल ही ईडीला घ्यावीच लागते. अशा प्रकरणांमध्ये ईडी वेगळा एफआयर करत नाही. ईडीने केलेल्या या कारवाईशी राज्य सरकारचा काहीही संबंध नाही. राज्य सरकार सूडबुद्धीने वागते आहे, जाणीवपूर्वक निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आली आहे, या प्रकारचे आरोप कालपासून होत आहेत त्याला काहीही अर्थ नाही असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

” याप्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल जे दोषी नसतील त्यांच्यावर कारवाई होणार नाही.  त्यामुळे जाणीवपूर्वक कुणाला गुंतवण्याचा हेतू नाही. तसेच विधानसभा निवडणुकीत आमचा विजय निश्चित आहे.  ज्याला राजकारण कळते त्याला हे कधीच वाटणार नाही की आम्ही हेतुपुरस्सर ही कारवाई केली  ” असाही टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.