मुंबई,दि.२(पीसीबी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहे. पर्यावरण सांभाळून आम्हाला विकास करायचाय, असं स्पष्ट करत आरेमधलं आता एक पानही तोडता येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. भाजप नेते आणि ठाकरेंचे कट्टर विरोधक मानले जाणारे नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंकडे नाणार आंदोलकांसंबंधी मागणी केली आहे.
आरे आंदोलनाचे केसेस मागे घेतले!! आता नाणार आंदोलनाचे केसेस पण परत घ्यावेत, अशी मागणी ट्वीट करत नितेश राणे यांनी उद्धव यांच्याकडे केली आहे. नाणारचे आंदोलकही पर्यावरण आणि आपल्या हक्कासाठीच लढत होते, असंही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
आरे आंदोलनाचे केसेस मागे घेतले!!
आता नाणार आंदोलनाचे केसेस पण परत घ्यावेत..
ते ही पर्यावरण आणि आपल्या हक्कासाठीच लढत होते..— nitesh rane (@NiteshNRane) December 1, 2019
दुसरीकडे नितेश यांचेच बंधू निलेश यांनी मात्र उद्धव यांच्यावर केसेस रद्द करण्यावर टीका केली आहे. केसेस रद्द करण्यात कसलीच हुशारी नाही, असं म्हणत त्यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला आहे.