आम्ही असेपर्यंत राजकीय प्रादुर्भाव होणार नाही – संजय राऊत

0
374

मुंबई. १८ (पीसीबी): महाराष्ट्रात आम्ही असेपर्यंत राजकीय प्रादुर्भाव होणार नाही, आम्ही फवारणीचे पंप घेऊन फिरत आहोत. शिवसेना खासदारांच्या बैठकीनंतर नेते संजय राऊत यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

आज शिवसेनेच्या सर्व खासदारांची मुख्यमंत्र्यांसोबत वर्षा या निवासस्थानी बैठक पार पडली. सर्व खासदारांच्या मतदारसंघातील कोरोना प्रदूर्भावाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बैठक बोलावली असल्याचं नेते संजय राऊत यांनी बैठकीनंतर स्पष्ट केलं. तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील बैठकीशी आजच्या या बैठकीचा संबंध नसल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

आजच्या या बैठकीत राजकीय चर्चा झाली नसून राज्यात सरकारला कुठलाही धोका नसल्याचं संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं. राज्यात आम्ही असेपर्यंत राजकीय प्रादुर्भाव होणार नाही असा विश्वास व्यक्त करत त्यासाठी आम्ही फवारणीचे पंप घेऊन फिरत आहोत असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

खरंतर आज साडे तीन महिन्यानंतर शिवसेनेचे सर्व खासदार एकत्र आले. प्रत्येक लोकप्रतिनिधीला आपल्या मतदारसंघातील अडचणी नेत्याने ऐकून घ्याव्या असं वाटत असतं. त्यासाठीच आजची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.

या बैठकीला लोकसभा आणि राज्यसभेचे असे एकूण शिवसेनेचे 21 खासदार उपस्थितीत होते. प्रत्येक खासदाराच्या जिल्ह्यात अधिकाऱ्यांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात येत असलेल्या उपाय योजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच लॉकडाऊनमुळे उद्योग – व्यवसायांवर आणि शेतकऱ्यांवर होत असलेला परिणाम याबाबत चर्चा करण्यात आली. या परिस्थितीत केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीबाबतही खासदारांच्या भूमिकेबाबत मुख्यमंत्र्यांनी मतं जाणून घेतली. यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये समन्वय साधण्यासाठी आणि केंद्राने सुचवलेल्या मार्गदर्शक तत्वांची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यासंदर्भात खासदारांनी सक्रिय सहभाग घ्यावा याबाबत मुख्यमंत्र्यांकडून सूचना देण्यात आल्या.मात्र सध्या राजस्थान मध्ये सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्शवभूमीवर आजची शिवसेनेच्या खासदारांची बैठक महत्वाची मानली जाते. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर आज खासदारांसोबत बैठक घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीचा कानोसा घेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सर्व खासदारांना त्यांच्या मतदारसंघातली राजकीय हालचालींवर नजर ठेवण्याच्या सूचना ठाकरे यांनी दिल्याचं बोललं जातंय.