आदित्य ठाकरेंनी अर्ज भरल्यानंतर उध्दव ठाकरेंनी मानले मनसेचे आभार

0
407

मुंबई, दि. ३ (पीसीबी) –   युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज (गुरूवार) वरळी मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याआधी त्यांनी शक्तिप्रदर्शन करत रॅली काढली. यावेळी  रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे, आमदार सुनील शिंदे  आदी उपस्थित होते.

आदित्य ठाकरेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक आणि जनतेचे आभार मानले. तसेच मनसेने आदित्य यांच्या विरोधात उमेदवार दिला नसल्याबाबत विचारले असता देखील त्यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांचे आभार मानले.  जे जे या निवडणुकीसाठी आदित्यला आशीर्वाद देताहेत त्यांना मी धन्यवाद देतो, मी या सर्वांप्रती ऋणी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी वरळीचे विद्यमान आमदार सुनील शिंदे यांचे विशेष आभार मानले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, वरळीच्या जनतेच्या आदित्यचा स्वीकार केला आहे, त्याबद्दल त्यांचे आभार.  माझ्यापर्यंत निवडणूक न लढविण्याची आमच्या कुटुंबाची परंपरा होती. मात्र आता नवीन पिढी आहे. त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे विचार नवे आहेत. तरुणांच्या विचारानेच देश आणि राज्य पुढे जावे ही जनतेची इच्छा आहे, असे ठाकरे म्हणाले.