नांदेड, दि. १२ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आणखी ५ वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर येताच मोदी आश्वासनांची पूर्तता करतील. ते पुन्हा थापा मारणार नाहीत, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.
नांदेडमध्ये आठवले बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, राज्यातील दुष्काळी परिस्थिती भीषण आहे. त्यामुळे राज्य सरकार उपाययोजना करत आहे. केंद्राकडूनही मदत केली जात आहे. दुष्काळ निवारणासाठी सिंचन क्षेत्र वाढविण्याची गरज आहे. नव्या उद्योगांची उभारणी करावी लागेल. तसेच शेतीला जोडधंदाही आवश्यक आहे, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.
दरम्यान, मी ज्यांना साथ देतो, त्यांचीच सत्ता येते़. माझी साथ आता भाजपसोबत आहे. त्यामुळे देशात पुन्हा भाजपची सत्ता येईल, आणि मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, असा विश्वासही आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.