आता महाविकास आघाडीचे नेते अधिक जबाबदारीने कामाला लागतील

0
228

मुंबई, दि. १० (पीसीबी) : भाजपने उत्तर प्रदेशसह चार राज्यांमध्ये मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होणार असल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र या चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. उत्तर प्रदेशसहीत इतर राज्यात भाजप सत्ता राखण्यात यशस्वी ठरली आहे. फक्त पंजाबचा निकाल वेगळा लागला आहे, असं सांगतानाच सत्ता बदलासाठी त्यांना आणखी अडीच वर्ष थांबावं लागेल. त्यानंतर त्यांना दिसेल. माझी खात्री आहे आता जो निकाल लागला तो लक्षात घेऊन महाविकास आघाडीचे नेते अधिक जबाबदारीने कामाला लागतील. त्यामुळे अधिक चित्रं चांगलं दिसेल. राज्यातील आघाडी सरकार टिकेल आणि त्यानंतर पुन्हा सक्सेस होईल, असा दावा शरद पवार यांनी केला आहे.

पाच राज्यांचे निकाल जाहीर होत आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं. पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होती. तिथे एक वेगळं चित्रं पाहायला मिळत आहे. पण पंजाबमधील बदल भाजपला अनुकूल नाही. मात्र काँग्रेसला झटका देणारा हा बदल आहे. दिल्लीत केजरीवाल यांनी ज्या प्रकारचं यश संपादन केलं आणि ज्या प्रकारे प्रशासन सांभाळलं त्याबद्दल दिल्लीच्या लोकांनी त्यांना पावती दिली. पंजाब हे दिल्लीच्या शेजारचं राज्य आहे. त्यामुळे दिल्लीतील कामाचा परिणाम पंजाबमध्ये झाला. तसेच पंजाब सोडलं तर इतर राज्यात जे पक्ष आहेत. त्यांनाच मतदारांनी समर्थन दिलं आहे. त्यामुळे इतर राज्यात भाजपचं सत्ता राखण्यात यशस्वी ठरली आहे, असं शरद पवार म्हणाले.

किमान समान कार्यक्रमावर सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. काँग्रेसला निवडणुकीत चांगला रिझल्ट द्यावा लागेल असंही त्यांनी सांगितलं. इतर राजकीय पक्षाने कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे सांगण्याचा मला अधिकार नाही. त्यांनीच त्यांचा विचार करावा. मला वाटतं काँग्रेस त्याबाबत विचार करेल, असंही ते म्हणाले. मात्र, ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला. ईव्हीएम बाबत काही लोकांच्या तक्रारी आहेत. पण मी त्यावर भाष्य करू शकत नाही. आम्ही जेव्हा जिंकतो तेव्हा आम्ही ईव्हीएवर बोलत नाही. हरल्यावर ईव्हीएमबाबत बोलतो. काही लोकांच्या तक्रारी आहेत. आमच्यासमोर प्रेझेंटेन्शन दिलं होतं. पण असाच निकाल का लागला हे मी मान्य करत नाही, असं सांगतानाच अखिलेश यादव यांच्या पक्षाला मोठ्या जागा मिळाल्या आहेत. त्या दुर्लक्षित करता येत नाही. त्यांना सत्ता मिळाली नाही. पण त्यांना मोठा आकडा मिळाला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

गोव्यातील राष्ट्रवादीच्या पराभवाला पवार यांनी अप्रत्यक्षपणे तृणमूल काँग्रेसवर टीका केली. तृणमूलने ऐनवेळी गोव्याच्या निवडणुकीत प्रवेश केला. एकदम सर्व जागा लढवायच्या आणि अन्य पक्षाचे लोक घेऊन जागा लढवायच्या हे जर तृणमूलने टाळलं असतं तर बरं झालं असतं. उदाहणार्थ माझ्या पक्षाचा एकच आमदार होता. चर्चिल हे त्याचं नाव. तृणमूलने गोव्यात लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर इतर पक्षाच्या लोकांना आपल्याकडे घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे चर्चिल त्यांच्या पक्षात गेला. या पद्धतीने निवडणुकीच्या तोंडावर एखाद्या राज्यात स्थान नसताना एखाद्या पक्षाने संबंध सर्वच्या सर्व जागा लढवायच्या आणि तिथल्या स्थानिक आणि अन्य विरोधी पक्षांशी सुसंवाद ठेवायचा नाही याचे दुष्परिणाम होत असतात. त्यांनाच नव्हे तर इतर पक्षांनाही ते सहन करावे लागते, अशा शब्दात पवारांनी तृणमूल काँग्रेसला फटकारले.
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीनंतर राज्यातील ईडीच्या कारवाया वाढतील का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, ईडी सीबीआयच्या कारवाया सुरूच आहे. अनिल देशमुखांच्या घरी 90 धाडी मारल्या. एका व्यक्तीच्या घरी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर 90 धाडी मारण्याचा नवीन कार्यक्रम दिल्लीच्या राज्यकर्त्यांनी घेतला आहे. त्याला तोंड द्यायचं आहे, असंही ते म्हणाले.