मुंबई, दि. २३ (पीसीबी) – आता चातुवर्ण येण्याची वाट बघा, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंग यांना लगावला आहे. प्रज्ञासिंह यांना गोळवलकर गुरुजींची शिकवण असून त्या आपल्या विचारधारेप्रमाणे वक्तव्य करत आहेत, असाही टोला आव्हाड यांनी लगावला.
खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी मध्यप्रदेशातील सीहोर येथील एका कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले आहे. मी नाले, गटारे साफ करण्यासाठी खासदार झाले नाही. आम्ही गटारे साफ करण्यासाठी नाही . आम्ही तुमची शौचालय स्वच्छ करण्यासाठी अजिबातच नाही निवडून आलो. आम्ही जे काम करण्यासाठी निवडलो गेलो आहोत, ते काम आम्ही इमानदारीने करु, असे आम्ही पूर्वीही म्हणत होतो. आजही त्यावर ठाम आहोत आणि उद्याही आमचे म्हणणे तेच असेल, असे साध्वी प्रज्ञा सिंग म्हणाल्या आहेत.
दरम्यान, या वक्तव्याचा निषेध करताना आता चातुवर्ण येण्याची वाट बघा, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. प्रज्ञासिंह यांना गोळवलकर गुरुजींची शिकवण असून त्या आपल्या विचारधारेप्रमाणे वक्तव्य करत आहेत, अशी टीकाही आव्हाड यांनी केली.