मुंबई, दि. ३० (पीसीबी) – राज्यात केलेल्या विविध विकासकामांमुळे जनतेमध्ये भाजपविषयी प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी पंधरा वर्षे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार नाही. इतर पक्षांतील नेते व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या बोधचिन्हाचे अनावरण चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, शहरी व ग्रामीण भागातील विकासकामांचा अनुभव सामान्य माणूस घेत आहे. प्रत्येक भागातील लोकप्रतिनिधींना भाजपमध्ये प्रवेश करावा असे वाटते. आपल्या भागाचा विकास करण्यासाठी नेत्यांना भाजपसोबत यावेसे वाटते. भाजपामध्ये घाणेरडे राजकारण होत नाही, याची इतर पक्षातील नेत्यांना जाणीव झाली आहे.