“अमरावतीतील ‘त्या’ दंगलीमागे नवाब मलिकांचाच हात”: हाजी अराफात यांचा गंभीर आरोप

0
440

मुंबई, दि.१६ (पीसीबी) : महाराष्ट्रात त्रिपुरातील कथित घटनेचे तीव्र पडसाद उमटले. मुस्लिम समाजाने काढलेल्या निषेध मोर्चात अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार पाहायला मिळाला. त्यानंतर भाजपकडून अमरावती बंदची हाक देण्यात आली. त्यावेळीही मोठ्या प्रमाणात दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झालेत. अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर आरोप केल्यानंतर आता हाजी अराफात यांनी मलिकांवर पलटवार केलाय. अमरावती दंगलीमागे नवाब मलिकांचाच हात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

अमरावती दंगलीमागे नवाब मलिक यांचा हात आहे. मलिक यांनी मुंबईतून पैसे पोहोचवण्याचं काम केलं. नवाब मलिक यांचे रझा अकादमीचे प्रमुख सईद नुरींसोबत जुने संबंध आहेत. त्यांनीच ही दंगल घडवून आणली, असा गंभीर आरोप हाजी अराफात यांनी केलाय. सईद नुरीसोबत, रझा अकादमीसोबत फोटो जोडण्याचं काम केलं. हा फोटो हजरत नईम यांच्या घरी, मदरसा आणि मशिदीतला आहे. महाविकास आघाडीचे सगळेच मोठे नेते तिथे जातात. जेव्हा जेव्हा एनसीपीचं सरकार आलं तेव्हा सईद नुरी बिळातून बाहेर येतो. भिवंडी, आझाद मैदान सगळ्या दंगलीत त्यांचंच नाव आहे. नवाब मलिक आणि सईद नुरींचे फोटो पाहा. हल्लीच काही कार्यक्रम झाले त्यात हे दोघे एत्रक आल्याचं सांगत अराफात यांनी मलिक आणि नुरी यांचा फोटोही दाखवला. रझा अकादमी हे भाजपचं पिल्लू असेल तर उद्धव ठाकरे रझा अकादमीच्या लोकांसोबत कसे? असा सवालही अराफात यांनी केलाय. ही दंगल भाजपनेच घडवली याबाबत मलिक यांच्याकडे काही पुरावे आहेत का? मलिकांना आव्हान आहे की सईद नुरीला विचारा नाहीतर मोईन यांना विचारा की फोटो कुठला, असंही अराफात म्हणाले. खिलाफत हाऊसला काय बैठक झाली ती नवाब मलिकांनी राज्याला सांगावं, शरद पवार यांनीही सांगावं, असं आव्हान देतानाच नवाब मलिकांचा राज्यात दंगलीचा इरादा आहे. हिंदू संघटनांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोपही अराफात यांनी केलाय.

भाजपने बंदच्या आडून सुनियोजितपणे दंगली भडकवण्याचं काम केलं. पोलिसांनी हा कट उधळून लावला. राज्यात दंगल भडकवण्याचे भाजपचे षडयंत्र होते. राज्यातील जनतेने संयम राखला. त्यामुळे राज्यात इतर ठिकाणी दंगली भडकल्या नाही. अमरावती सोडून कुठेच काही घडलं नाही. अमरावतीत कोणत्याही दोन समुदायात दंगल झाली नाही. भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी 2 तारखेच्या रात्री दंगलीचं षडयंत्रं रचलं. दारु वाटल्या गेली, पैसे वाटण्यात आले… दंगली भडकावल्या गेल्या. पोलीस चौकशीत माहिती मिळाली आहे. मुंबईतून दंगली भडकवण्यासाठी पैसे गेले. आमदाराच्या माध्यमातून या पैशाचं वाटप करण्यात आलं. त्याचीही चौकशी सुरू आहे, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.