‘अब तक ५६’ या चित्रपटाच्या पटकथा लेखकाची इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या

0
423

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – अभिनेता नाना पाटेकर यांनी प्रमुख भूमिका साकारलेल्या ‘अब तक ५६’ या चित्रपटाच्या पटकथा लेखकाने राहत्या घरातील इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.११) दुपारी दोनच्या सुमारास अंधेरी पश्चिम, सात बंगला परिसर, वसंत सोसायटी येथे घडली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
रविशंकर आलोक (वय ३२, रा. अंधेरी पश्चिम, सात बंगला परिसर, वसंत सोसायटी) असे आत्महत्या केलेल्या लेखकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविशंकर मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात सात बंगला परिसरात असलेल्या वसंत सोसायटीत राहत होते. दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी सात मजली इमारतीच्या टेरेसवरुन उडी घेऊन आत्महत्या केली. रविशंकर यांनी तणावातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आला आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.