मुंबई, दि. १९ (पीसीबी) – आता कावळ्यांची नाही, तर मावळ्यांची चिंता करावी, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष सोडणाऱ्यांना लगावला आहे. अनेक जण पक्ष सोडून जात आहे. मात्र, जे लोक खटल्यात आहेत, त्यांच्यावर राज्यकर्ते दबाव आणत आहे. त्यामुळे पक्षाची गळती होत आहे. आपण पूर्ण स्वच्छ आहात, तर आपल्याला कसलीच चिंता नाही, असे ही पवार यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या बैठकीत पवार बोलत होते. महिलांवरील अत्याचार व विकृत मनस्थितीवर जरब बसण्याची यंत्रणा ढिसाळ झाली आहे. राज्यकर्ते महिलांना सन्मानाने वागणूक देत नाहीत, ते यंत्रणा काय चालवणार? अशी टीका पवार यांनी सरकारवर केली.
आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना तरुणांना आणि महिलांना पुढाकार देण्याचे काम करावे. नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार केला जाईल, असेही पवार यांनी यावेळी सांगितले. संकटाच्या काळात जो उभा राहतो त्याला लोक विसरत नाही. यासाठी आपण पक्षाच्या संघटनेकडे लक्ष घालणे गरजेचे आहे, हे कार्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे, असेही पवार म्हणाले.