नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – कॉफी विथ करण या शो मध्ये महिलांविषयी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे भारताचा फलंदाज हार्दिक पंड्या आणि के एल राहुल यांच्यावर भारतीय संघातून खेळण्यास बंदी घातली होती. त्यांच्यावरील ही बंदी तत्काळ प्रभावाने उठवण्यात आलेली आहे. त्यामुळे न्यूझीलंड दौऱ्यातील उर्वरित सामन्यांत खेळण्यात या दोघांचा मार्ग मोकळा झाला आहे.
मात्र, त्यांची चौकशी सुरूच राहणार आहे. लोकपाल (होमडसमन) नेमल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. पांड्या-राहुल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात ५ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.
हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल या दोघांनी शो मध्ये काही विधाने केली होती. त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. त्यानंतर बीसीसीआय च्या प्रशासकीय समितीने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.मात्र, अमिकस क्युरी पी एस नरसिंह यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांच्यावरील बंदी तत्काळ उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.