श्रीक्षेत्र भीमाशंकरच्या विकासाला गती! 288 कोटींच्या आराखड्यास हिरवा कंदील

0
6

मुंबई : नुकतीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्या’बाबत बैठक पार पडली. बैठकीत ‘श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा’ (कुंभमेळा 2027 – गर्दी व्यवस्थापन व इतर सोयीसुविधा) साठी 288.17 कोटींची मान्यता देण्यात आली आहे. सोबतच यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश देखील दिले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक येतात, त्यांना केंद्रबिंदू ठेऊन येथे विविध दर्जेदार सुविधा विकसित कराव्यात. कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी श्री क्षेत्र भीमाशंकरच्या विकासाचे काम पूर्ण करावयाचे आहे, त्यादृष्टीने विकास आराखड्याच्या अंमलबजावणीचा कालबद्ध कार्यक्रम तयार करावा, टाइमलाईन ठरवून काम सुरू करण्यात यावे. असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, भीमाशंकर परिसराला लाभलेल्या नैसर्गिक सृष्टीसौंदर्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन येथे व्यापक प्रमाणात ‘इको टुरिझम’ संकल्पना विकसित करण्यात यावी. मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या वनराईचा उपयोग करून वनभ्रमण पथ तयार करावा. त्याचसोबत पर्यटक, भाविकांसाठी रोपवेची सुविधा विकसित करावी. निगडाळे येथे पर्यटकांसाठी सोयीच्या ठरणाऱ्या सर्व सुविधा जसे की हॉटेल, रेस्टॉरंट त्याचसोबत इच्छुकांसाठी निवास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. भीमाशंकर येथील दळणवळण सुविधा, वाहतूक मार्ग, अंतर्गत रस्ते यांच्या विकासास प्राधान्य द्यावे. तसेच येथे हेलीपॅड सुविधा उपलब्ध करून देण्याचेही नियोजन करावे.या परिसराचा विकास करताना स्थानिक व्यावसायिक, दुकानदारांना नवीन दुकाने द्यावीत. तसेच राजगुरुनगर-तळेघर-भीमाशंकर महामार्ग हा सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी उत्तम पर्याय आहे, त्यादृष्टीने त्याचा विकास करण्यात यावा. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे पर्यटक, भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी, त्यासाठी अतिरिक्त पोलीस चौकी या परिसरात उभारावी. तसेच विनाखंड वीज पुरवठा सुविधा उपलब्धतेच्या दृष्टीने वीज उपकेंद्र ही या ठिकाणी द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. यावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी श्री क्षेत्र भीमाशंकरच्या विकास कामांबाबत सविस्तर सादरीकरण केले. दरम्यान, या बैठकीला मंत्री ॲड. आशिष शेलार, आ. दिलीप वळसे पाटील आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.श्री क्षेत्र भीमाशंकर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यात, सह्याद्री पर्वतरांगांमध्ये निसर्गरम्य परिसरात वसलेले आहे. भगवान शंकराचे हे सहावे ज्योतिर्लिंग मानले जाते. येथे भीमा नदीचा उगमही आहे. धार्मिक महत्त्वाबरोबरच पर्यावरणीय व जैवविविधतेच्या दृष्टीनेही हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.