दि . १८ ( पीसीबी ) – आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील विकासाच्या मुद्द्यावरुन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाचे राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. याच वादातून आता भाजपचे भोसरी मतदारसंघाचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. मी पैलवान, कोणाला घाबरत नाही, समोरच्याला अंगावर घ्यायची मला सवय आहे, असे सांगत महेश लांडगे यांनी अप्रत्यक्षपणे अजितदादांविरोधात शड्डू ठोकला आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपने पिंपरी-चिंचवडचा विकास केला. पण या सगळ्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न अजित पवार यांच्याकडून होतो, असे महेश लांडगे यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले. त्यामुळे आता यावरुन पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट करण्यात अनेकांचे योगदान आहे. आता दिव्यांग भवन कोणी उभारले. याची तारीख आयुक्तांनी सांगायला हवी होती. 2017ला पालिकेत भाजपची सत्ता आली, त्यानंतर हे दिव्यांग भवन यासंह अनेक विकास झाला. त्यामुळं या शहराच्या विकासात आमचं ही योगदान आहे. इतरांचे योगदान आम्ही नाकारत नाहीच. मात्र, बऱ्याच जणांचे योगदान आम्ही नाकारत नाही. शहरातल्या नागरिकांनी जर तुमच्याकडे काय दिलं नसतं तर काय केलं असतं? घंटा….. म्हणजे देवळात जाऊन घंटा वाजवत बसले असते का? आता गेली 30 वर्षे काय केलं असं जे जे येऊन सांगतायत, ते आम्ही कुठं नाकारत आहोत. तुम्ही केलं की पण आम्ही पण 2017 पासून विकास केलेला आहेच ना? हे कसं काय नाकारता, असे महेश लांडगे यांनी म्हटले.
आम्ही केलं की भ्रष्टाचार आणि त्यांनी केलं की कामं. आम्ही इथं पारदर्शक काम करत आहोत. खासदार अप्पा बरोबर आहे का? जे चांगलं ते चांगलं, मी कोणाला घाबरत नाही. पैलवान आहे, सर्वांना अंगावर घायची सवय आहे. स्पष्ट सांगताना माझा पाऊल डगमगणार नाही. देवेंद्र भाऊ करुन जातो आम्ही नाव दुसऱ्याचं लागतं. जरा माझं पण नाव कुठं तरी लिहावं. आयुक्तांना प्रोटोकॉल मध्ये बदल करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी महेश लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
महेश लांडगेंच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात महेश लांडगे यांना सबुरीचा सल्ला दिला. फडणवीसांनी म्हटले की, महेश लांडगे खूप चिंता व्यक्त करत आहेत. आम्ही काम करतो अन श्रेय दुसरे घेतात. पण मी सांगतो की ‘ये पब्लिक है, ये सब जानती है.’ आपण दुसऱ्याचे श्रेय घेऊ शकत नाही अन आपलं श्रेय दुसरा कोणी घेऊ शकत नाही. त्यामुळं फार चिंता करायचं नाही, आपण काम करत राहायचं. जनतेचा तुमच्यावर विश्वास आहे. ते आपण निवडणुकीत पाहिलं ना, जनतेने तुमच्या कामाचे श्रेय तुम्हाला दिलेलं आहे. आपण अनेक कामं केली, पण ते विषय आपण प्रतिष्ठेचे केले नाहीत. आता तुम्ही म्हणाले चिखलीचा टिपी नको, चला आत्ताच आयुक्तांना सांगतो तो टिपी फक्त स्थगित नाही तर तो रद्दच करा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस यांनी आज देहू येथील संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील संत परंपरेची महती सांगताना म्हटले की, आपला विचार हा वैश्विक विचार आहे. जगाला साद घालणारा आणि जगाला दिशा दाखवणारा विचार आहे. त्यामुळं हा विचाराचा प्रसार जगभर होणं गरजेचं आहे. अर्थात जोपर्यंत वारी आहे तो पर्यंत हा विचार संपणार नाहीच. कारण जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत वारी असणार आहेच. मूलतत्त्व ठेवून आधुनिक मार्गाने संतांचे विचाराचा प्रसार होणं गरजेचं आहे. यासाठी सरकार भक्कमपणे पाठीशी उभं असेल. इंद्रायणी स्वच्छ करायचं आपण हे नेहमी म्हणतो. मात्र जो पर्यंत सिवेज योग्यरीत्या होणार नाहीत, तो पर्यंत हे अशक्य आहे. त्यादृष्टीने आपण आज दोन एसटीपीचे लोकार्पण केले आहे, असे फडणवीसांनी सांगितले.