बिहार, दि . २४ ( पीसीबी ) : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर मोठे खुलासे होताना दिसत आहेत. तपास यंत्रणांनी दहशतवाद्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तपास सुरू केला आहे. काही ठिकाणी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याचीही माहिती आहे. पहलगामच्या हल्ल्यात हिंदू पर्यटकांना टार्गेट बनवण्यात आले. हल्ल्यावेळी नेमके काय घडले, हे सांगताना आता पर्यटक दिसत आहेत. पहलगामच्या या हल्ल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड असा संताप हा बघायला मिळतोय. आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्याबद्दल मोठे भाष्य केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये बोलताना म्हणाले की, २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी ज्या क्रूरतेने निष्पाप लोकांना मारले त्यामुळे संपूर्ण देश दुःखी आहे. संपूर्ण राष्ट्र सर्व पीडित कुटुंबांच्या दुःखात त्यांच्यासोबत आहे. या हल्ल्यात कोणीतरी आपला मुलगा, भाऊ किंवा पती गमावला आहे. देशाच्या शत्रूंनी भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचे धाडस केले आहे.
ज्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला, ज्यांनी या हल्ल्याचा कट रचला त्यांना कल्पनाही करता येणार नाही त्यापेक्षा मोठी शिक्षा मिळेल, दहशतवादाचा नायनाट करण्याची वेळ आली आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे संकेत दिले आहेत. पंतप्रधान मोदींनी बिहारमध्ये ८६९ कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लोकांना घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या.
पहलगामवरील हल्ल्याची माहिती मिळताच विदेशातून भारतात मोदी दाखल झाले आणि त्यांनी विमानतळावरच अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. काल रात्री दिल्लीमध्ये महत्वाची बैठक झाली आणि काही कठोर पाऊले भारताकडून उचलण्यात आली. आज पंतप्रधान मोदी यांनी थेट इशाराच दिलाय. बिहारच्या भाषणात हल्ल्याबद्दल बोलताना पुढे मोदी म्हणाले की, दहशतवाद भारताच्या आत्म्याला तोडू शकत नाही. दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे. १४० कोटी भारतीयांची इच्छाशक्ती दहशतवाद्यांचे कंबरडे मोडेल. बिहारच्या भाषणा मोदी या हल्ल्याबद्दल काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या.