मोठी बातमी! महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार, थोड्याच वेळात आयोगाची पत्रकार परिषद

0
17

नवी दिल्ली, दि. 14 (पीसीबी) : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील जनतेचे लक्ष महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांकडे लागले आहे. अखेर आज दुपारी 3.30 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात येणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद आहे. दुपारी 3.30 मिनिटांनी ही पत्रकार परिषद सुरू होईल. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रसह झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल, अशी माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यातच आता केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद पार पडत असल्याने सर्वांचेच लक्ष त्याकडे लागले आहे. महाराष्ट्रातील निवडणूक यंत्रणेची तयारीही अंतिम टप्प्यात सुरु आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष दिल्लीकडे लागले आहे.

महाराष्ट्र विधानसभेत 288 सदस्य आहेत. महाराष्ट्रात सध्या महायुतीचे सरकार आहे. झारखंड विधानसभेत 81 सदस्य आहेत. या राज्यात 2019 मध्ये निवडणुका झाल्या होत्या. हरियाणामध्ये 90 जागा आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द करण्यात आले. जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे राज्य विभागले गेले आहे. याआधी 2014 मध्ये येथे शेवटची निवडणूक झाली होती.