जेव्हा सत्ता डोक्यात जाते तेव्हा……. शरद पवारांचा नितेश राणेंना टोला

0
5

रत्नागिरी, दि. २३ (पीसीबी) : रत्नागिरीतील चिपळूणमध्ये शरद पवार यांची जाहीर सभा झाली. 18 वर्षांनंतर शरद पवारांची चिपळूणमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना शरद पवार यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. धारावीतील मस्जिदचा अनधिकृत भाग पाडण्यात आला, त्याबाबत भाजप नेते नितेश राणे यांनी प्रक्षोभक विधान केलं. त्याचा शरद पवारांनी जोरदार समाचार घेतला. भाजप नेते नारायण राणे यांच्या मुलांवरही शरद पवारांनी जोरदार टीका केली आहे. सत्ता येते आणि जाते. तेव्हा संयम ठेवायचा असतो. सत्ता असते तेव्हा जमिनीवर पाय ठेवायचा असतो. आणि सत्ता नसेल तर चिंता करायची नसते. काम करत राहायचं असतं, अशा शब्दात शरद पवारांनी सुनावलं आहे.

रत्नागिरी या जिल्ह्यात काय घडलं माहीत नाही. हा जुना जिल्हा आहे. या जुन्या जिल्ह्यात एक मुख्यमंत्री होते. ते मुख्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होते. आणि अलिकडे मी बघतो. मीही मुख्यमंत्री होतो. माझ्या घरात एक मुलगी आहे. देशाच्या पार्लमेंटमध्ये चांगलं काम करणारी तिचा लौकीक आहे. विनम्रपणा हा लौकीक आहे. पण सिंधुदुर्ग जिल्ह्याने एक मुख्यमंत्री दिला. त्यांनी माझ्यासोबत काम केलंय. त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण त्यांचे चिरंजीव ज्या पद्धतीने हल्ली बोलतात, ज्या पद्धतीने टीका टिप्पणी करतात, मी महाराष्ट्रातील इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पुढची पिढी या प्रकारची झालेली पाहिली नाही. आज त्या लोकांची भाषा, ही कशा प्रकराची भाषा आहे. समाजात सर्व जाती धर्माचे लोक आहेत, असं शरद पवार यांनी सभेत म्हटलं.

भारत हे राष्ट्र सर्व धर्मीयांचं आहे. इथे हिंदू, सीख आणि मुस्लिम आहेत. आणि तुमच्या राज्यातील एका केंद्रीय मंत्र्यांची मुलं मुस्लिम समाजाच्या संबंधी या पद्धतीने जाहीर वाक्य करतात त्यांना आवर घातलं जात नाही. उलट टेलिव्हिजनवर त्यांनी बोलावं याची काळजी घेतली जाते याचा अर्थ सत्ता डोक्यात गेली आहे. जेव्हा सत्ता डोक्यात जाते तेव्हा लोक एक होतात आणि त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहत नाही, असं पवारांनी यावेळी म्हटलं आहे.