देशात पुन्हा श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती; फ्रीजमध्ये आढळले तरुणीच्या शरीराचे २० तुकडे; शेजाऱ्यांना दुर्गंधी आल्याने प्रकार उघड..

0
3

बंगळुरू, दि. २२ (पीसीबी) – दिल्लीमध्ये घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाने देश ढवळून निघाला होता. देशात संतापाची लाट उसळली होती. आता अशाच प्रकारची घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. एका महिलेची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे २० तुकडे फ्रिजमध्ये ठेवण्यात आल्याच्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बंगळुरूच्या व्यालिकवल परिसरात शनिवारी (दि. २१ सप्टेंबर) ही घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेल्या तरुणीचे नाव महालक्ष्मी (२९ वर्ष) आहे. तिच्या पतीचे नाव हेमंत दास आहे. पण गेल्या काही दिवसांपासून महालक्ष्मी एकटीच राहत होती. सदर खून १५ दिवसांपूर्वीच झाला असून महालक्ष्मीच्या शरीराचे तुकडे करून १६५ लीटरच्या फ्रिजमध्ये ठेवण्यात आले आहेत. शेजाऱ्यांना दुर्गंधी येऊ लागल्यानंतर त्यांनी याची माहिती महालक्ष्मीच्या नातेवाईकांना दिली. त्यांनी येऊन पाहिल्यानंतर सदर प्रकार उघड झाला आहे. व्यालिकवल पोलीस आता या घटनेचा तपास करत आहेत.
अतिरिक्त पोलीस आयुक्त एन. सतीश कुमार यांनी सांगितले की, आम्ही न्यायवैद्यक पथक आणि श्वान पथकाला पाचारण केले असून या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. या नाराधमी कृत्यामागचे नेमके काय कारण होते? हे अद्याप कळू शकलेले नाही. आमचा पुढील तपास सुरू आहे.
श्रद्धा वालकर प्रकरण काय?

वसईतील श्रद्धा वालकर नावाची (वय २८)तरुणी आपल्या प्रियकर आफताब पूनावाला याच्यासोबत दिल्लीमध्ये राहत होती. १८ मे २०२२ मध्ये आफताबने तिची हत्या केली आणि तिच्या शरीराचे तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले होते. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गुरुग्राम येथील जंगलात शरीराचे तुकडे फेकून दिले होते. १४ नोव्हेंबर २०२२ रोजी हा सर्व प्रकार उघड झाला आणि देशात एकच खळबळ उडाली होती.

या प्रकरणामध्ये पोलिसांनी ६ हजार पाणी आरोपपत्र दाखल केले होते. त्यात म्हटले होते की, श्रद्धासोबत राहात असतानाही आफताब ‘बम्बल’ या डेटिंग अ‍ॅपवरून इतर स्त्रियांशी संपर्क साधत होता. याच अ‍ॅपवर त्या दोघांचीही भेट झाली होती. इतर स्त्रियांच्या संपर्कात असल्याचे श्रद्धाच्या लक्षात आल्यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते.

त्यानंतर १८ मे २०२२ रोजी आफताबने श्रद्धाची गळा दाबून हत्या केली, त्यानंतर तिच्या मृतदेहाचे १७ तुकडे केले आणि जवळपास तीन आठवडे ते फ्रिजमध्ये लपवून ठेवले. त्यानंतर पुढील काही दिवसांमध्ये त्याने दिल्लीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेहाच्या तुकडयांची विल्हेवाट लावल्याचे आरोपपत्रामध्ये म्हटले आहे.