जर मागण्या मान्य झाल्या नाही तर, फडणवीसांसह भाजपला…..- मनोज जरांगेचा इशारा

0
22

मुंबई, दि. १८ (पीसीबी) : मराठावाडा मुक्ती संग्रामाच्या दिवसापासून जरांगेंनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केलं आहे. विधानसभा निवडणुकीआधी सरकारला शेवटची संधी असल्याचं सांगत, जरांगेंनी सरकारला शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. जर मागण्या मान्य झाल्या नाही तर, फडणवीसांसह भाजपला गुडघे टेकवायला लावणार, असा इशाराच जरांगेंनी दिला आहे. जरांगेंचं हे 6 वं आमरण उपोषण सुरु झालं आहे. जरांगे पाटलांच्या 3 प्रमुख मागण्या आहेत. मराठा-कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा. दुसरी मराठ्यांच्या कुणबी नोंदींवरुन सगेसोयऱ्यांनाही आरक्षण देण्याची अंमलबजावणी करा आणि तिसरी हैदराबादसह सातारा संस्थान आणि बॉम्बे गॅझेट लागू करा.

जरांगेंची मागणी स्पष्ट आहे, की मराठा समाजाला कुणबी अर्थात ओबीसीतून आरक्षण द्या. त्याचसंदर्भात, जरांगेंचा मुंबईच्या दिशेनं निघालेला मोर्चाला, मुख्यमंत्री शिंदेंनी सगेसोयऱ्यांची अधिसूचना काढून शांत केला होता. आता जरांगेंचा सवाल आहे, की अधिसूचना काढली मग सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी का नाही ?

मुख्यमंत्री लवकरच योग्य निर्णय घेतील, असं शिंदेंचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका अवघ्या सव्वा 2 महिन्यांवर आहे. विधानसभेची आचरसंहिता निवडणुकीचा घोषणा पुढच्या 15 दिवसांत म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात होईल. खरं निवडणुकीची तयारी, जरांगेंनीही केली आहे. महायुतीचे 113 आमदार पाडण्याचा इरादा त्यांनी बोलूनही दाखवला मात्र, त्याआधी आपण सरकारला शेवटची संधी देत असल्याचं जरांगेंच म्हणणं आहे.

दुसरीकडे धनगर आरक्षणाची मागणी देखील होऊ लागली आहे. आठ दिवसात धनगरांच्या आरक्षणाचा विषय मिटला नाही तर राज्यभर धनगर समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार. या आंदोलनात होळकर घराणे तितक्याच ताकतीने सहभागी होणार तसेच आगामी विधानसभेला धनगरांची ताकद या सरकारला दाखवणार असा इशारा अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी दिला आहे.