भाजपात २४ नेते अस्वस्थ, बावनकुळेंच्या भाष्यामुळे पक्षात खळबळ

0
41

मुंबई, दि. ३ – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरून महायुतीत मतभेद होताना दिसत आहेत. उमेदवार निश्चित करण्यासाठी महायुतीसमोर मोठा पेच निर्माण होत आहे. हसन मुश्रीफ यांच्या महायुतीतल्या प्रवेशानंतर इच्छुक असलेले समरजितसिंह घाटगे यांनी शरद पवार गटाची वाट धरली.

घाटगे यांच्याप्रमाणे भाजपात २४ नेते अस्वस्थ असून त्यातील चार-पाच जण पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे.

बावनकुळे म्हणाले, भाजपाकडे २४ नेते असे आहेत जे अजित पवारांच्या उमेदवाराला प्रचंड ताकदीने लढत देऊ शकतात. आता या २४ जणांना आपली पुढची वाटचाल कशी राहील याची चिंता आहे त्यामुळे थोडी अस्वस्थता आहे. चार-पाच भाजपा नेते शरद पवारांकडे जातील पण त्याठिकाणी गेल्यानंतर तिथे तुतारी लावणारे खूप आहेत, असे माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी सांगितले.
आम्ही प्रत्येकाशी बोलतोय, समरजितसिंह घाटगे यांच्याशीही आम्ही चर्चा केली. हर्षवर्धन पाटील यांच्याशी देवेंद्र फडणवीसांनी खूप वेळा चर्चा केली. समरजितसिंहला थांबायचे नव्हते. त्यांना विधानसभा निवडणूक लढायचीच आहे त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला. भाजपात जे इन्कमिंग झाले त्याठिकाणी तितक्या ताकदीचे उमेदवार नव्हते तिथे इतरांना पक्षात घेतलं जातं.

जेवढं प्रभावी नेतृत्व पक्षात आणलं जातं, तेव्हा पक्ष वाढतो. हर्षवर्धन पाटलांना मागे उमेदवारी दिली ते पराभूत झाले. आता पुन्हा निवडणूक आली आहे. महायुतीत आता परिस्थिती वेगळी आहे. महायुती नसती तर ते उमेदवार झाले असते असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, ज्यांना थांबायचे नाही, विधानसभा लढल्याशिवाय मार्गच नाही असे दोन-चार लोकं जातील. त्यांच्या राजकीय आयुष्याला आम्ही का ब्रेक लावायचा. दुसऱ्याकडे जाऊन निवडून येतील असे त्यांना वाटतेय, भाजपा उमेदवारी देऊ शकत नाही अशा प्रकरणात आम्ही
कसं रोखणार?. निवडून येतील असा आत्मविश्वास आहे ते जातील. आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतोय.

सरकार आणि सरकारनंतरही ज्या ज्याठिकाणी ताकद द्यावी लागते ते आम्ही देतो. केंद्रात आपलं सरकार आहे. तिथे काही व्यवस्था आहे तिथे सामावून घेऊ असं सांगितले जात आहे. त्याशिवाय असेही बरेचजण आहेत त्यांना तिकीट नाही दिले तरी त्यांना घाई नाही.
पक्ष सांगेल ते करू अशी भमिका घेतात त्यांचीही यादी मोठी आहे, असे बावनकुळे यांनी म्हंटले आहे.