शासकीय कागदपत्रांमध्ये फेरबदल करत फसवणूक

bpcauthor bpcauthor
2 Min Read

दि. 1 ऑगस्ट (पीसीबी) दिघी,
दस्त आणि इतर शासकीय कागदपत्रांमध्ये फेरबदल करून एका व्यक्तीने शेतकऱ्याची फसवणूक केली. हा प्रकार 18 नोव्हेंबर 1993 ते 28 डिसेंबर 2023 या कालावधीत चोविसावाडी, तलाठी कार्यालय चऱ्होली बुद्रुक, दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक आठ विश्रांतवाडी आणि इतर ठिकाणी घडला.

ज्ञानेश्वर शंकर रसाळ (वय 57, रा. जेऊर, ता. पुरंदर) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार युवराज कुबेरनाथ शेळके (रा. निबोडी, ता. खंडाळा, जि. सातारा) आणि इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोविसावाडी येथील जमीन सर्वे नंबर 110 अ हिस्सा क्रमांक 3/2 (जुना सर्वे नंबर 916 अ हिस्सा क्रमांक 3/2) येथील 20 गुंठे क्षेत्र फिर्यादी रसाळ यांच्या वडिलांच्या कायदेशीर मालकीचे होते. 19 नोव्हेंबर 1993 रोजी रसाळ यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर वारस म्हणून फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांची नोंद झाली.

त्यातील एकजण युवराज शेळके आणि त्याचे साथीदार यांनी मिळून दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 8 आणि इतर ठिकाणी संगनमत करून रसाळ यांच्या आजोबांकडून 18 नव्हेंबर 1993 रोजी 50 हजार रुपयांना सदर जागा विकत घेतल्याचे बनावट व खोट्या सह्यांचे दस्त तयार केले. ते खरे असल्याचे भासवून दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्रमांक आठ येथे सादर केले. गावाच्या अधिकार अभिलेखात फेरफार करून आरोपीने त्याच्या आजोबांच्या नावाची नोंद करत फसवणूक केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article