विकास कामाला विरोध नाही परंतु गरिबांवरती अन्याय नको

0
79
  • बाबा कांबळे यांनी आळंदी नगरपालिकेत भेटून केली मागणी

-टपरी, पथारी, हातगाडी पंचायत पूर्ण ताकदीने सोबत असल्याचा व्यासायिकांना विश्वास*

पिंपरी, दि.९ (पीसीबी) – आळंदी नगरपरिषदेच्या वतीने झाडे बाजार येथे देखभाल दुरुस्तीची कामे सुरु आहेत. ही कामे करताना तिथे असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांचे ओटे न तोडता काम करावे. त्यांचे नुकसान होऊ नये याची खबरदारी घेण्याची मागणी टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली.

फळभाजी, विक्रेते, टपरीधारकांच्या प्रश्नांसाठी बाबा कांबळे यांनी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे, शहर अभियंता सचिन गायकवाड,अतिक्रमण अधिकारी अरूण घुंडरे, पाटिल,यांची भेट घेतली. सविस्तर बैठक घेऊन चर्चा केली. या वेळी अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिल्याल्यामुळे प्रशासनाला सहकार्याची भूमिका घेत आंदोलन स्थगित केले.

या वेळी टपरी, पथारी, हातगाडी पंचायत महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष बळीराम काकडे, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रकाश यशवंत, पुणे जिल्हा अध्यक्ष मल्हार काळे, आळंदी शहराध्यक्ष राहुल कुराडे, खेड तालुका अध्यक्ष सुलतान शेख, राष्ट्रीय चर्मकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष तुषार नेटके, सचिन आडवळे, शिवाजी मुसळे, अशोक पांढरे, राकेश देसले, सरला वाघ, अशोक मुंडे, सुरेखा कुऱ्हाडे, शिवाजी जगताप, मिराबाई लबडे, बवले आजी, सुमन मावशी, संगीता मोजे, माऊली शेटे,लक्ष्मण नेटके पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे इंद्रायणी नदी काठी, झाडे बाजार परिसरात अनेक वर्षापासून फळभाजी विक्रेते, छोटे हॉटेल व्यवसाय करणारे, चहा विक्री करणारे तसेच पथारी, हातगाडीधारक व्यवसाय करत आहेत. आळंदी नगरपरिषदेच्या वतीने पार्किंगच्या ठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. हे काम करताना व्यावसायिकांचे नुकसान होऊ नये याबाबत बाबा कांबळे यांनी मागणी केली. पथारीधारक, फळभाजी विक्रेत्यांना विस्थापित करू नये. त्यांचे ओटे तोडू नये, अशी व्यवसायिकांची मागणी असल्याचे बाबा कांबळे म्हणाले. या वेळी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. इंद्रायणी काठी होणाऱ्या विकास कामांना विरोध करणार नसून प्रशासनाला सहकार्य करू, असे आश्वासन बाबा कांबळे यांनी दिले. आळंदी नगरपरिषदेच्या वतीने चाकण चौक येथे सुशोभनीय तुळशी वृंदावन बांधण्यात आले. या कामाचे स्वागत बाबा कांबळे यांनी केले. विकासाच्या नावाखाली गरीब टपरी धारकांवरती अन्याय नको. त्यांचे पुनर्वसन झाले पाहिजे, अशी मागणी बाबा कांबळे यांनी केली.

व्यवसायिकांना ताकद देणार : बाबा कांबळे
या वेळी आळंदी मधील झाडे बाजार येथील प्रत्यक्ष जागेची व कामाची बाबा कांबळे यांनी पाहणी केली. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. टपरी, पथारी, हातगाडी, पंचायत संघटना पूर्ण ताकदीने सोबत असल्याचा विश्वास बाबा कांबळे यांनी व्यवसायिकांना दिला.

आळंदी चाकण चौक येथे नुकतेच नगरपालिकेच्या वतीने सुशोभीकरण करून तुळशी वृंदावन बांधण्यात आले हे तुळशी वृंदावन अत्यंत छान देखणे व सुंदर झाले असून या कामाचे देखील बाबा कांबळे यांनी कौतुक केले आहे