रस्त्यांची दुरुस्ती करा; जनसंवाद सभेत नागरिकांची मागणी

0
171

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – उद्यानात अनधिकृतपणे जाहिरात फलक लावणा-यांवर कारवाई करावी, उद्यानामध्ये लहान मुलांसाठी खेळणी बसविण्यात यावी तसेच ओपन जिम उभारण्यात यावे, रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे रात्रीस पथदिवे झाकले जाऊन रस्त्यावर अंधार पडत आहे, अशा फांद्यांची छाटणी करण्यात यावी, पावसामुळे रस्त्यावरील खड्डयात पाणी साचत आहे, पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करावी, रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशा विविध मागण्या महापालिकेच्या जनसंवाद सभेत नागरिकांनी केल्या.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी प्रत्येक सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज जनसंवाद सभा पार पडली.  या जनसंवाद सभेत ६७ नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रारवजा सूचना मांडल्या.  यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह  क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे १४, ८, ४, ८, १०, ४, १३ आणि ६ नागरिकांनी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले.  अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह, या  क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, पाणीपुरवठा विभागाचे  सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता सतीश इंगळे, समाज विकास विभागाचे उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, आरोग्य विभागाचे उप आयुक्त अजय चारठाणकर यांनी भूषवले. तसेच क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, सोनम देशमुख,  अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सीताराम बहुरे, विनोद जळक, विजयकुमार थोरात हे उपस्थित होते. आठही क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत स्थापत्य, जलनि:स्सारण, पाणीपुरवठा, विद्युत, नगररचना विभागांचे कार्यकारी अभियंता, उद्यान, वैद्यकीय, आरोग्य, करसंकलन या विभागांचे अधिकारी  उपस्थित होते.

आज झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या. ड्रेनेज वाहिन्या दुरुस्त करण्यात याव्यात, ड्रेनेज वाहिन्यांमध्ये गाळ साचल्यामुळे मलवहनास अडथळा निर्माण होऊन पाणी रस्त्यावर येत आहे, त्यामुळे दुर्गंध पसरून आरोग्यास धोका निर्माण होत आहे, सार्वजनिक शौचालयांमध्ये लावण्यात आलेले दिवे नादुरस्त झाले आहेत, तेथे नव्याने दिवे लावून शौचालयांची वेळोवेळी सफाई करण्यात यावी,    रस्त्यावर आणि इतरत्र बेवारस तसेच खाजगी वाहने उभे करण्यात येत आहेत, त्यावर कारवाई करण्यात यावी, पाणी पुरवठा पुरेशा दाबाने करण्यात यावा, उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांना दंड करावा, अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात यावी, रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने असे अतिक्रमणे काढण्यात यावे, खाजगी मालमत्ता धारकांकडून तसेच ठेकेदारांकडून अनेक दिवसांपासून रस्त्यावर टाकण्यात आलेल्या राडारोड्यामुळे रहदारीस अडथळा होत आहे, अशा संबंधितांना दंड  आकारल्यास रस्त्यावर राडारोडा टाकण्याचे प्रमाण कमी होईल, अशा सूचना वजा तक्रारी आज झालेल्या जनसंवाद सभेमध्ये नागरिकांनी मांडल्या.