हाथरस, बलरामपूर, आझमगड, बुलंदशहर, फत्तेहपूर – बलात्काराच्या घटनांनी उत्तरप्रदेश हादरले

0
754

बलरामपूर, दि. १ (पीसीबी) : उत्तरप्रदेशमधील हाथरस येथील अत्याचाराची घटना ताजी असताना पुन्हा एक निर्दयी घटना समोर आली आहे. हाथरस प्रकरणाचा देशभरात निषेध होत असताना आता यूपीतील बलरामपूरमध्ये 22 वर्षीय विद्यार्थिनीसोबत सामूहिक बलात्कार आणि हत्येची घटना समोर आली आहे. दवाखान्यात घेऊन जात असताना पीडितेचा मृत्यू झाला. मंगळवारी बलरामपूरच्या कोतवाली गैसडी क्षेत्रात ही घटना घडली. पीडितेच्या आईने आरोप केला आहे की, नराधमांनी तिच्या मुलीची कंबर आणि पाय तोडले होते, ज्यामुळं ती उभे राहू शकत नव्हती. दरम्यान, हाथरस पाठोपाठ बलरामपुरातील सामुहिक बलात्कार व हत्येची घटना समोर आल्याने लोकांमध्ये संतापाची भावना आहे. पाठोपाठ आझमगड, बुलंदशहर, फत्तेहपूर शहरातही अशाच अत्याचाराच्या घटना आता प्रकाशात आल्याने उत्तर प्रदेश हादरला आहे.

पीडितेच्या आईनं सांगितलं की, त्यांची मुलगी मंगळवारी दहा वाजताच्या सुमारास कॉलेजमध्ये अॅडमिशनसाठी गेली होती. तेव्हा काही नराधमांनी तिचं अपहरण केलं आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. सायंकाळपर्यंत ती घरी न आल्याने तिला फोन केला असता तिचा फोन बंद आला.

पीडितेला एका रिक्षावाला सात वाजेच्या सुमारास गंभीर अवस्थेत घेऊन आला. तिची अवस्था प्रचंड गंभीर होती. ती काही बोलूही शकत नव्हती. नातेवाईकांनी तिला स्थानिक डॉक्टरांकडे नेलं. मात्र स्थिती गंभीर असल्यानं डॉक्टरांनी लखनौला घेऊन जाण्याचं सांगितलं. मात्र तुलसीपूर हॉस्पिटलला पोहोचण्याच्या आधीच पीडितेचा मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्वीट करत यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी म्हटलं आहे, “हाथरसनंतर आता बलरामपूर मध्येही एका मुलीसोबक सामूहिक अत्याचार आणि घृणास्पद कृत्य केलं आहे. त्यात तिचा मृत्यू झाला. भाजप सरकारनं हाथरसप्रमाणे दुर्लक्ष आणि थातुरमातुर कारवाई न करता गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई करावी.”

तर काँग्रेस नेते राज बब्बर यांनी म्हटलं आहे की, “आता बलरामपूरमध्येही दलित समाजाच्या मुलीसोबत पाशवी कृत्य करण्यात आलं आहे. अशीच घटना आजमगड आणि बुलंदशहरमध्येही घडली आहे. प्रत्येक घटनांमध्ये पीडितांना न्यायाची अपेक्षा आहे. महिला सुरक्षेच्या गोष्टी करत सत्तेवर आलेल्या भाजप महिला सुरक्षेच्या आश्वासनांना विसरलं आहे. लेकींच्या जीवाच्या बदल्यात केवळ मदत देऊन काय होणार?”