’55 आमदारांमध्ये मुख्यमंत्री झाला मग, 50 नगरसेवकांमध्ये महापौर का होणार नाही?’ : संजय राऊतांची राजकीय टोलेबाजी

0
322

पिंपरी, दि.०९ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड शहरात शिवसेनेचा महापौर बनवणे हे आमचे ध्येय असल्याचं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलंय. पिंपरी चिंचवड शहरात किमान 50 नगरसेवक निवडून आणण्याचे उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यावर पत्रकारांनी 50 मध्ये पिंपरी चिंचवडचा महापौर होत नाही असं म्हटलं. त्यावर 55 आमदारांमध्ये मुख्यमंत्री झाला, 50 नगरसेवकांमध्ये महापौर का होणार नाही? असा सवाल करत त्यांनी राजकीय टोलेबाजी केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करायची की नाही ते योग्य वेळी ठरवू, असंही नमूद केलं. ते पिंपरी चिंचवडमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “सीबीआय, ईडी या यंत्रणांची प्रतिष्ठा केंद्र सरकारने धुळीला मिळवलीय. या संस्थांच्या माध्यमातून दहशत निर्माण केली जात आहे. पण हे फार काळ चालणार नाही. असा यंत्रणांचा दुरुपयोग करणारे नेते फार काळ टिकत नाहीत. यंत्रणांना फक्त विरोधकांच्या घराचे पत्ते माहिती आहेत, सत्ताधारी नेत्यांचे दिसत नाहीत. आम्ही त्यांना सत्ताधाऱ्यांचे पत्तेही पाठवू.”

“केंद्रात सहकार खाते तयार झाले आहे. ते केवळ महाराष्ट्र्राला त्रास देण्यासाठी तयार केले असेल तर हा आणखी एक सत्तेचा गैरवापर आहे. जर सहकार मजबूत करण्यासाठी हे नवीन खाते असेल, तर त्याचे आम्ही स्वागत करतो. सहकार हा राज्यघटनेनुसार राज्यांचा विषय आहे. मात्र राज्यातील सहकार संपवण्यासाठी केंद्रातील सहकार खाते काम करणार असेल, तर तो लोकशाहीला फार मोठा धोका आहे,” असं संजय राऊत यांनी सांगितलं. ते पुढे असही म्हणाले कि, “पंकजा मुंडे यांना राजकारणातून संपवण्याचे काम सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. दोन्ही छत्रपतींना मंत्रिमंडळात घेतले नाही. याबाबत त्यांच्या समर्थकांनी विचारणा करावी. ओबीसी आरक्षणशिवाय निवडणूका न घेण्यासंबंधी मुख्यमंत्री बोलतील.”

नारायण राणेंची दैदिप्यमान कारकीर्द पाहता त्यांना मोठे पद मिळायला हवे होते, असं म्हणत संजय राऊत यांनी राणेंना टोला लगावला. राणे यांना मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा न देण्याच्या मुद्द्यावर बोलताना आपल्याला त्याची माहिती नसल्याचं ते म्हणाले. तसेच विधानसभा अध्यक्ष निवडीवरून काँग्रेसमध्ये वाद नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.