साहित्यिक हा लोककलेचा आत्मा – रघुवीर खेडकर

bpcauthor bpcauthor
1 Min Read

इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने मोशी येथे सत्कार

दि.१९(पीसीबी)- ‘साहित्यिक हा लोककलेचा आत्मा आहे. आम्ही कलावंत साहित्यिकांच्या शब्दांना कलेच्या माध्यमातून जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांच्या लेखणीतून समाजाचे प्रतिबिंब उमटत असते, ते समाजाला दिशादर्शक असते. म्हणूनच साहित्यिकांनी केलेला हा लोककलेचा सन्मान माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे!’ असे उद्गार ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी बुधवार, दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी मोशी येथे काढले.

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने परिषदेचे संस्थापक व ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे आणि अध्यक्ष संदीप तापकीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना खेडकर बोलत होते. मागील वीस वर्षांपासून मोशी गावच्या यात्रेमध्ये सातत्याने तमाशाचे खेळ होत असतात. म्हणून आवर्जून तमाशाच्या मंचावरच त्यांचा सत्कार करण्यात आला. मोशी ही संतभूमी असल्याने सत्काराचे वेळी संतपरंपरेचे उपरणे, तुकाराम पगडी आणि सन्मानचिन्ह देण्यात आले.


अरुण बोऱ्हाडे यांनी रघुवीर खेडकर यांच्या लोककलेच्या कार्याचा गौरव करून सत्कारामागची भूमिका स्पष्ट केली. या सत्काराचेवेळी सचिव रामभाऊ सासवडे, ज्येष्ठ साहित्यिक सोपान खुडे, ज्येष्ठ साहित्यिक दादाभाऊ गावडे, तसेच डॉ. सीमा काळभोर, डॉ. पौर्णिमा कोल्हे, गणेश सस्ते, वंदना आल्हाट, काळुराम दामू सस्ते, सुनील जाधव सस्ते, महीपत साठे, अलंकार हिंगे, सचिन कामठे, अमर कांदे इत्यादी उपस्थित होते.

Share This Article