“बालविवाहमुक्त समाजासाठी सामूहिक लढा उभारण्याची गरज”. मा. रेणुका देशपांडे (सरकारी अभिवक्ता )

2 Min Read

दांडेकर पूल चौकात बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत प्रभावी जनजागृती
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंहगड विधी महाविद्यालय आणि मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दांडेकर पूल चौक येथे बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सिंहगड विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून प्रभावी जनजागृती केली.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या मा. रेणुका देशपांडे (सरकारी अभिवक्ता न्यायालय ) यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हटले,
“बालविवाह ही सामाजिक कुप्रथा असून ती पूर्णपणे तुटली पाहिजे. बालविवाह करणारे व त्यास प्रोत्साहन देणाऱ्यांवर कायद्याने कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. आजही बालविवाह हा समाजावरील कलंक आहे आणि तो दूर करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.”
मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे अध्यक्ष श्री. विकास कुचेकर म्हणाले कि, प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय वाटचालीत खंबीर साथ देणाऱ्या माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त हा जनजागृती कार्यक्रम होत आहे. बालविवाह ही प्रथा बालकांच्या शिक्षण,आरोग्य आणि सन्मानाने जीवन जगण्याच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करते. या अन्यायकारक प्रथेविरुद्ध विद्यार्थ्यांनी उभारलेली ही चळवळ समाजपरिवर्तनाची नांदी आहे.”
कार्यक्रमात बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षणावर होणारा परिणाम,अल्पवयीन मातृत्वाचे आरोग्यधोके, तसेच बालकांच्या सर्वांगीण विकासावर होणारे दुष्परिणाम याबाबत माहिती देण्यात आली.
या प्रसंगी मा. रेणुका देशपांडे (सरकारी अभिवक्ता ) मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर, संचालक अण्णा जोगदंड, संजना करंजावने, मुरलीधर दळवी,प्रकाश बोदडे, सिंहगड विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, सेवा प्राधिकरणाचे स्वयंसेवक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Share This Article