मोठी बातमी! जरांगे पाटलांनी केला शेवटचा पत्ता ओपन; अंतरवालीमध्ये घडामोडींना वेग

bpcauthor bpcauthor
2 Min Read

आंतरवली सराटी, दि. 29 (पीसीबी) : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे, आज निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता यावेळी महाविकास आघाडीविरोधात महायुती असाच सामना रंगण्याची शक्यता आहे. मात्र आता या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील उडी घेतली आहे. मनोज जरांगे हे देखील काही विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्यानं महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. येत्या 31 तारखेला मराठा, मुस्लिम व दलित समीकरण जुळवण्यासाठी महत्त्वपूर्ण फायनल बैठक होणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मराठा, दलित व मुस्लिम समीकरण जुळवण्यासाठी काही धर्मगुरू लांबून येणार आहेत. त्यांना हेलिकॉप्टरची उद्याची परवानगी मिळाली नाही. काल रात्री सगळ्यांचे प्रतिनिधी आले होते, मराठा मुस्लिम आणि दलितांचे प्रतिनिधी दोन दिवसांपासून हेलिकॉप्टरची परवानगी घेत आहेत. त्यांना उद्याची परवानगी मिळाली नाही, त्यामुळे आता फायनल बैठक 31 तारखेला होणार असून, समाज बांधवांना माझी पुन्हा पुन्हा विनंती आहे की, 31 तारखेला इकडे कोणीही येऊ नका, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. चूक केलेली मान्यच करायची नाही ही त्यांची वृत्ती आहे, त्यांना मला बोलायची गरज काय आहे? आम्ही त्यांना कधी विरोधक शत्रू मानलं? खोट्या केसेस करणं, एसआयटी नेमनं, सग्या सोयऱ्याची अमलबजावणी न करू देणं, आम्ही चूक नाही करत तुम्ही चूक केली. आंदोलन बेदखल करायचं, गुरमीत भाषा करायची, आम्हाला खुन्नस द्यायची त्याचा हिशोब तर लोक करणारच आहेत असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. भाजप आणि काँग्रेसच्या ज्या लोकांना तिकीट मिळालं नाही त्यांच्यामध्ये खदखद असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Share This Article