खंडणीसाठी अल्पवयीन मुलाचे टोळक्याकडून अपहरण

bpcauthor bpcauthor
2 Min Read

चिखली, दि. २१ ऑगस्ट (पीसीबी )

तुझा भाऊ प्रतिस्पर्धी टोळीच्या मुलांसोबत राहतो. तो ट्रक चालवूनही आम्हाला हप्ता देत नाही, असे म्हणत एका टोळक्याने अल्पवयीन मुलाचे अपहरण केले. जोपर्यंत हप्ता देत नाही तोपर्यंत तुझया भावाला सोडणार नाही, असे म्हणत अल्पवयीन मुलास लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना 19 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास चिखली येथे घडली.

अंबादास राठोड, अफझल शेख, गणेश नप्ते आणि त्यांच सात साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अपहरण आणि सुटका झालेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ अरूण शितोळे हा करण रोकडे याच्या मुलांसोबत राहतो. तसेच त्याचा स्वतःचा ट्रक असूनही तो आम्हाला हप्ता देत नाही, या कारणावरून आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी याचे सोमवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास दुर्गानगर, सोनावणे वस्ती येथून अपहरण केले. त्यास महादेवनगर येथे नेऊन त्याचा भाऊ अरूण यास फोन लावण्यास भाग पाडले. फोन स्पीकरवर ठेऊन पैशाची मागणी केली. मात्र आपण बाहेरगावी असून येण्यास दोन-तीन दिवस लागतील, असे अरूण याने सांगितले. यामुळे संतापलेल्या आरोपींनी शिवीगाळ करीत जोपर्यंत हप्ता देणार नाही तोपर्यंत तुझया भावाला सोडणार नाही, असे बोलून फोन कट केला. त्यानंतर अल्पवयीन मुलास शिवीगाळ करीत लाथा बुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. पोलिसात तक्रार दिली तर पुन्हा तुला सोडणार नाही. तुला जिवे मारून टाकू, अशी धमकी देत त्यास सोडून दिले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article