तिघांचा महाडमधील सावित्री नदीत बुडून मृत्यू

bpcauthor bpcauthor
2 Min Read

दि. १९ ऑगस्ट (पीसीबी) महाबळेश्वर – महाबळेश्वरमधील तिघांचा महाडमधील सावित्री नदीत बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. दर्ग्यात दर्शन घेतल्यानंतर जेटीकडे गेलेला एकजण पाय घसरून सावित्री नदीत पडला. त्याला वाचविताना अन्य दोघे पाण्यात पडले. तिघांनाही पोहता येत नसल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमधील सख्खे भाऊ विवाहित होते.

दिलावर शहाबुद्दीन नालबंद, मुनावर शहाबुद्दीन नालबंद (रा. गवळी मोहल्ला, महाबळेश्वर) आणि जाहीद जाकीर पटेल (रा. रांजणवाडी, ता. महाबळेश्वर), अशी बुडून मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. दिलावर हे वेल्डिंग कारागीर होते. तर त्यांचा भाऊ मुनावर हे बांधकाम सुपरवायझर होते. सख्ख्या भावापैकी एकाची पत्नी मुले तर दुसऱ्या भावाचा मुलगाही दर्शनासाठी गेला होता. सव (ता. महाड) येथील दर्ग्यात दर्शन घेतल्यानंतर कुटुंबीय दर्गा परिसरात थांबले. तर तिघेजण जेटीकडे गेले.

जेटीजवळच्या पायऱ्यांवरून खाली उतरत असताना निसरड्या पायरीवरून एकाचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्याच्या नादात इतर दोघेही पाण्यात पडले. त्यानंतर तिघांचाही बुडून मृत्यू झाल्याची माहिती महाडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी दिली. घटनेनंतर महाड रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तिघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. या घटनेमुळं महाबळेश्वरमधील गवळी मोहल्ल्यावर शोककळा पसरली आहे.

शुक्रवार शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने सावित्री नदीला पूर आला आहे. सावित्री नदीकाठच्या जेटीजवळ पाण्याचा खोल डोह आहे. त्यातच तिघांनाही पोहता येत नव्हते. त्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला. तिघांच्याही मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री उशिरा त्यांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Share This Article