६० वर्ष हे राजकारणातून निवृत्त होण्याचं योग्य वय – राहुल गांधी

0
719

पुणे, दि. ५ (पीसीबी) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुण्यात हडपसरच्या मगरपट्टा सिटी येथे तरुणांशी संवाद साधला. मराठी अभिनेता सुबोध भावे आणि आरजे मलिष्का यांनी राहुल गांधींची मुलाखत घेतली. राहुल गांधी यांनी पाच हजार महाविद्यालीयन विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी राजकारणात निवृत्ती असली पाहिजे का? असा प्रश्न विचारला असता आपण त्याच्याशी सहमत असल्याचं सांगितलं. वयाच्या ६० व्या वर्षी राजकारणातून निवृत्त झालं पाहिजे असं मत राहुल गांधींनी व्यक्त केलं.

सुबोध भावे यांनी जेव्हा संवाद साधण्यास खूप हिंमत लागते असं विचारलं असता राहुल गांधींनी सांगितलं की, ‘अनुभवातून हिंमत आली. जे सत्य आहे ते स्विकारलं. सत्यातून हिंमत येते. जर खोटं स्विकारलं तर भीती निर्माण होते. सत्य कधी कडवं असतं पण ते स्विकारावं लागतं’. पुढे बोलताना जर एखादी गोष्ट कऱण्याचा निर्णय मी घेतला तर त्याचे काही परिणाम असले तरी मी ते पूर्ण करतो असं सांगितलं.

आम्ही अनेकांशी संवाद साधून त्याचं म्हणणं जाणून घेतलं आणि त्यानंतर जाहीरनामा तयार केला. ७२ हजारांची कल्पनाही मला लोकांशी बोलल्यानंतर सुचली अशी माहिती राहुल गांधींनी दिली. जे शक्य आहे तेच मी बोलतो. मला उगाच हवेत बोलायला आवडत नाही असंही त्यानी म्हटलं.

रोजगाराच्या प्रश्नावर बोलताना भारत रोज २४ हजार नोकऱ्या गमावत आहे, आपल्या देशात कौशल्याचा आदर केला जात नाही अशी खंत राहुल गांधींनी व्यक्त केली. ‘तुम्ही ७२ हजार रुपये कसे उभारणार विचारलं असता तुम्ही नीरव मोदी, विजय मल्ल्या यांच्याबद्दल ऐकलं आहे का अशी राहुल गांधींची विचारणा केली. ७२ हजार रुपये देण्यासाठी आयकर वाढवला जाणार नाही याची हमी मी देतो, सर्वसामान्यांना कोणताही फटका बसणार नाही असंही ते म्हणाले.

एअर स्ट्राइकसंबंधी बोलताना त्याचं सर्व श्रेय हवाई दलाचं आहे. एअर स्ट्राइकचं राजकारण करण्याच्या विरोधात मी आहे, मला त्याचं राजकारण करायचं नाही. पंतप्रधान जेव्हा अशा गोष्टींचं राजकारण करतात तेव्हा मला वाईट वाटतं असं राहुल गांधींनी म्हटलं. ज्याप्रमाणे मी संवाद साधत आहे त्याप्रमाणे नरेंद्र मोदी संवाद का साधत नाहीत ? असा प्रश्नही यावेळी राहुल गांधींनी विचारला. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात जितकी गुतंवणूक केली पाहिजे तितकी सरकार करताना दिसत नाही, आम्ही सत्तेत आल्यास ते करु असं आश्वासन यावेळी राहुल गांधींनी दिलं.

माझं नरेंद्र मोदींवर प्रचंड प्रेम आहे, माझा त्यांच्यावर अजिबात राग नाही, पण त्यांचा माझ्यावर राग आहे असं राहुल गांधींनी म्हणताच हॉलमध्ये नरेंद्र मोदींच्या नावे घोषणाबाजी करण्यात आली.