५७ कोटींच्या देणगीचा अपहार प्रकरणात किरीट सोमय्या विरोधात गुन्हा दाखल

0
248

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांतच्या नावाखाली देशातील सर्वात मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला. या आरोपांनंतर सोमय्या यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचं चित्र दिसत आहे. या प्रकरणामध्ये ट्रॉम्बे पोलीस स्थानकामध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. वर्गणीच्या माध्यमातून ५७ कोटी गोळा करुन ते सोमय्या यांनी आपल्या उद्योगासाठी वापरल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बुधवारी सायंकाळी कलम ४२० म्हणजेच फसवणुकीच्या गुन्ह्याखाली किरीट सोमय्या आणि त्याचा मुलगा नील सोमय्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलीय. निवृत्त सैनिक असणाऱ्या बबन भोसले यांनी या प्रकरणामध्ये पोलिसांकडे तक्रार दाखल केलीय. ट्रॉम्बे पोलीस स्थानकामध्ये किरीट सोमय्या आणि नील सोमय्याविरोधात एफआयआर दाखल करुन घेत पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केलाय.

किरीट सोमय्या यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत अटक करावी अशी मागणी संजय राऊत यांनी बुधवारी केली. “किरीट सोमय्या विक्रांत वाचवा असे टी शर्ट घालून फिरत असताना लाखो, करोडो लोकांनी त्यांना पैसे दिले. याशिवाय अनेक कंपन्यांकडून त्यांनी विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली कोट्यवधी गोळा केले. ही रक्कम ५७ ते ५८ कोटी होती अशी माहिती त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने दिली आहे,” असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

“महात्मा किरीट सोमय्या यांच्या मुलाखती मी वाचल्या. यावर त्यांनी या सरकारला देशभक्ती नाही असं म्हटलं होतं. २०० कोटी गोळा करणार असून ते राजभवनात जमा करु असं त्यांनी सांगितलं होतं. माझ्याकडे राज्यपाल कार्यालयातून आलेलं पत्र आहे. आरटीआय कार्यकर्त्याने राज्यपालांना २०१३, २०१४, २०१५ विक्रांतसाठी जे पैसे गोळा केले होते ते जमा झालेत का? अशी विचारणा केली. यावर राज्यपाल कार्यालयाने असे कोणतेही पैसे जमा करण्यात आलेले नाहीत असं उत्तर देण्यात आलं. देशाच्या सुरक्षेशी, राष्ट्रीय भानवेशी केलेली ही फसवणूक आहे. हा देशद्रोह आहे,” असा आरोप संजय राऊतांनी केली आहे.

“देशद्रोही किरीट सोमय्यांनी ५७ कोटी जमा केले. पण हा आकडा १०० कोटींच्या वर असावा असं मला वाटतं,” असं राऊत म्हणाले. आता आपल्याला तर काही समजलं नाही असं ते म्हणतील सांगत संजय राऊतांनी फोटो दाखवले. “आम्ही चर्चगेट स्टेशनला त्या डब्यात ५ हजार टाकल्याचं मला अनेकांनी सांगितलं आहे. ही रक्कम कुठे गेली? कोणाच्या घशात गेली? ही रक्कम भाजपाने निवडणुकीत वापरली की किरीट सोमय्यांची कंस्ट्रक्शन कंपनीत वापरले?,” अशी विचारणा संजय राऊतांनी केली.

“हा देशद्रोहाचा गुन्हा होऊ शकतो. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली गोळा केलेले पैसे कोणाच्या खिशात गेले याची महाराष्ट्र सरकारच्या तपास यंत्रणांनी चौकशी केलीच पाहिजे, पण केंद्रीय तपास यंत्रणा जर पारदर्शक आणि निष्पक्ष असतील तर सीबीआय, इन्कम टॅक्स आणि भाजपाची पदाधिकारी असणारी ईडी यांनी चौकशी करावी. त्यांना काही सापडत नसेल तर मी मदत करेन,” असं संजय राऊतांनी सांगितलं. यात अनेक लोक आहेत पण सोमय्या या भ्रष्टाचाराच्या कटाचे सूत्रधार आहेत असा आरोप संजय राऊतांनी केला.