१७ हजार कैद्यांना कोरोना पावला

0
331

मुंबई, दि. १२ (पीसीबी) : कोरोनामुळे लाखो लोक आयुष्यातून उठले, तर दुसरीकडे हजारो अभागी मंडळींचे भाग्य उजळले आहे. या विषाणूने राज्यातील कारागृहातही शिरकाव केल्यामुळे सुमारे ५० टक्के कैदी सोडण्याचा निर्णय राज्याच्या हाय पॉवर कमिटीने घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यातील कारागृहातील तब्बल चार हजार कैद्यांना सोडण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता.
राज्यात 48 जेल आहेत. या जेलमध्ये एकूण ३५ हजार २३९ कैदी आहेत. यापैकी ५० टक्के कैद्यांना सोडणार आहेत, असा निर्णय राज्याच्या हाय पॉवर कमिटीने घेतला आहे.

देशभरातील जेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. सध्या राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने याची सुमोटो दखल घेतली. ज्या व्यक्तीला सात वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते आणि ज्यांना सात वर्षांची शिक्षा झाली आहे अशा कैद्यांना पेरोल, जामीन किंवा तात्पुरता जामीनावर सोडा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

राज्यातील विविध जेलमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे जेलमधील कैद्यांना कोरोनाची लागण होत आहे. मुंबईतील ऑर्थर रोड जेलमधील २६ कर्मचारी आणि ७८ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आर्थर रोडमधील कोरोनाबाधितांचा आकडा १०४ वर पोहोचला आहे.

नुकतेच पुण्याच्या येरवडा कारागृहातून सातार्‍यातील कारागृहात पाठवलेल्या कैदींमधून ४ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यामुळे साताऱ्यातील कारागृहात एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरात लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत राज्यातील कारागृहात ही लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली. मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, कल्याण जिल्हा कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह ही पाच कारागृह बंद ठेवण्यात आली आहे. जोपर्यंत वरिष्ठांकडून आदेश येत नाही तोपर्यंत अनिश्चित काळासाठी ही पाच कारागृहे लॉकडाऊन राहणार आहेत.